भारताचा माजी कर्णधार विराट कोहली हा आज १०० वा कसोटी सामना खेळत आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात मोहाली येथे कसोटी सामना सुरू आहे. विराटच्या १०० व्या कसोटी सामन्याच्या निमित्तानं सामना सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयकडून विराटचा विशेष सत्कार करण्यात आला.
१०० व्या कसोटी सामन्यापूर्वी विराट कोहलीचा टेस्ट कॅप देत सन्मान करण्यात आला. यावेळी त्याच्यासोबत पत्नी अनुष्का शर्माही मैदानावर उपस्थित होती. याप्रसंगी विराटनं आपल्या भावना व्यक्त केल्या. श्रीलंकेविरुद्ध खेळत कसोटी सामन्यांचं शतक पूर्ण केलं आहे. विराट कोहली १०० कसोटी सामने खेळणारा १२ वा भारतीय खेळाडू आहे. विराट कोहलीची कारकीर्द आजवर अनेक चढउतारांमधून गेली आहे.
#TeamIndia Head Coach Rahul Dravid presents @imVkohli with his 100th baggy blue to commemorate his 100th appearance in whites.#VK100 | #INDvSL | @Paytm pic.twitter.com/PVFhsbe4Rj
— BCCI (@BCCI) March 4, 2022
मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या हस्ते ही कॅप देण्यात आली आणि द्रविडने विराटचे कौतुक केले. त्याने २०० कसोटी खेळावेत अशा शुभेच्छाही दिल्या. विराट म्हणाला, हा माझ्यासाठी खूप खास क्षण आहे. माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य इथं उपस्थित आहेत. माझ्या बालपणीच्या नायकाच्या हस्ते मला ही कॅप देण्यात आली त्यासाठी मी बीसीसीआयचे आभार मानतो.
२००८मध्ये वन डे क्रिकेटमध्ये पदापर्ण करणाऱ्या विराटला कसोटी पदार्पणासाठी २०११ची प्रतीक्षा पाहावी लागली. त्यानं ९९ कसोटीत ५०.३९च्या सरासरीने ७९६२ धावा केल्या आहेत. त्यात २७ शतकं व२८ अर्धशतकांचा समावेश असून नाबाद २५४ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे.
भारतासाठी २५० वन डे व १०० कसोटी खेळणारे चार खेळाडू आहेत आणि त्यात आज विराटचा समावेश झाला. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि अनिल कुंबळे यांच्यानंतर भारताकडून २५० वन डे व १०० कसोटी खेळणाऱ्या यादीत विराट कोहलीचे नाव लिहिले गेले आहे.