अजूनही अापण मुलींना चूल अाणि मूल यामध्येच अडकवून ठेवत अाहोत. अद्यापही अापली मानसिकता बदलत नाहीये. अनेक खेळाडूंना अापल्या खडतर प्रवासात या गोष्टींना सामोरं जावं लागतं. अर्जुन पुरस्कार विजेत्या कबड्डीपटू माया अाक्रे-मेहेर अाणि छत्रपती पुरस्कारप्राप्त कोमल देवकर या दोन पिढ्यांमधील कबड्डीपटूंनी अापल्या काटेरीमार्गाचा क्रीडाप्रवास 'कबड्डीतील दोन पिढ्या' या कार्यक्रमाद्वारे उलगडून दाखवला. निमित्त होतं कबड्डीमहर्षी स्व. शंकरराव साळवी यांच्या जन्मदिनानिमित्त शारदाश्रम विद्यालय अाणि अोम कबड्डी प्रबोधिनीतर्फे अायोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिराचं.
पूर्वी खेळण्यासाठी मुलींना घरातून विरोध व्हायचा, पण अाज तशी परिस्थिती नाही. मुलींचं वय जसं वाढत जातं, तसा अाजही मुलींना स्वयंपाक शिकण्याचा अाग्रह केला जातो. अामच्या काळात अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा अधिकाधिक खेळण्याची अाणि अन्य राज्यातील कबड्डीपटूंचा खेळ जवळून पाहण्याची संधी मिळत होती. पण अाजच्या पिढीला ही संधी कमी मिळत असल्याची खंत माया मेहेर यांनी व्यक्त केली.
गेली १०-१२ वर्ष मी कठोर मेहनत घेतली. वेळप्रसंगी लोकांची कुचकट बोलणी पचवली, तेव्हा भारतीय संघापर्यंतचा पल्ला गाठू शकले. अजूनही भरपूर मोठा पल्ला गाठायचा अाहे. सध्याच्या मुलींनी खेळाबरोबरच शिक्षणाकडेही लक्ष द्यावे. टक्केवारीच्या मोहात पडू नका. सध्या कबड्डीला चांगेल दिवस अाले असून त्याचा फायदा उठवा, असा सल्ला नुकताच शिवछत्रपती पुरस्कार स्वीकारणाऱ्या कोमल देवकरनं दिला.
शारदाश्रम शाळेत अायोजित करण्यात अालेल्या या प्रशिक्षण शिबिरात पियूष कलमकर अाणि दीक्षा सिंग यांची सर्वोत्तम शिबिरार्थी म्हणून निवड करण्यात आली. या विजेत्यांना शारदाश्रम शाळेचे प्राचार्य मंगेश कोचरेकर यांच्या हस्ते गौरविण्यात अाले. या प्रशिक्षण शिबिराला छत्रपती पुरस्कार विजेते सीताराम साळुंखे, तारक राऊळ तसेच वैशाली सावंत, कबड्डी संघटक शशिकांत राऊत यांची उपस्थिती लाभली.
हेही वाचा -
राष्ट्रीय बीच कबड्डीसाठी उपनगरच्या कोमल देवकरकडे महाराष्ट्राचे नेतृत्व