''आजचं माझं भाषण म्हणजे टीजर्स, ट्रेलर्स आहेत. पिक्चर २ एप्रिलला गुढीपाडव्याला शिवतीर्थावर होईल'', असं राज ठाकरे यांनी मनसेच्या १६व्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त जनतेला संबोधित करताना म्हटलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)चा आज १६व्या वर्धापनदिन सोहळा झाला. पुण्यात या सोहळ्याचं आजोयन करण्यात आलं होतं. यावेळी भाष्य करताना राज ठाकरे यांनी ''पिक्चर २ एप्रिलला गुढीपाडव्याला शिवतीर्थावर होईल'',असं म्हटल्यानं नेमकं गुढीपाढव्याला काय बोलणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
पुण्यातील सासवड इथं असलेल्या गणेश कला केंद्रामध्ये राज ठाकरे यांनी जनतेला संबोधित केलं. यावेळी राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकारणावर त्यांनी भाष्य केलं. ''राज्यात काय चाललंय काही कळत नाही मला. सत्ताधारी म्हणतात आम्हाला संपवायला निघाले, विरोधी पक्ष म्हणतो आम्हाला संपवायला निघाले. मग उरलं कोण? उरलो आपण'', राज ठाकरे यांनी म्हटलं.
''असे सत्ताधारी-विरोधक बघितले नाहीत कधी. वीट आलाय आता. शिव्या वगैरे काय देतायत, कुठली भाषा आहे. राजकारणात येणाऱ्या पिढ्या काय पाहातायत. त्यांना वाटेल राजकारण असंच असतं. हे जर विधानसभेत बोलत असतील, तर ग्रामपंचायत, जिल्हापरिषदेला काय बोलत असतील. तोंडाला येईल ते बोलायचं.'' , असंही पुढे राज यांनी म्हटलं
पुण्यातील सासवड इथं असलेल्या गणेश कला केंद्रामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी जमली आहे. मनसेच्या प्रमुख नेत्यांपासून पुण्यातील स्थानिक कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती.
संजय राऊतांना नक्कल करत हाणला टोला
किती बोलताय? ते संजय राऊत किती बोलतायत? सगळ्यात एक अॅक्शन असते. चॅनल लागलं की हे सुरू. कॅमेरा हटला की नॉर्मल. हे अॅक्शन कुठून आणतात? काही वर्षांपूर्वी सभेला गेलो होतो. बाजूला एक नेता बसला होता. सहज काहीतरी बोलत होतो. तेवढ्यात त्याच्या नावाची घोषणा झाली. मला म्हटला भाषण करून येतो. म्हटलं जा. तिथे लगेच स्टाईल. म्हटलं आत्ता नीट होतास, झालं काय अचानक. तसंच आहे ते. डोळे, भुवया उडवून बोलणं… किती बोलतो? आपण काय बोलतो, कसं बोलते हा प्रश्न आहे. महाराष्ट्रातल्या भविष्यातल्या पिढ्या हे पाहातायत. ते उद्या काय शिकतील? आणि या सगळ्या वातावरणात तुमची अपेक्षा आहे की लोकांनी तुम्हाला मतदान करावं?
एकटा बसलेला असतो वाट बघत
महिलांच्या प्रश्नांविषयी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांविषयी, नोकऱ्यांच्या मुद्द्यावर, एसटीविषयीही कुणी बोलत नाही. चिंता कसली, एकमेकांवर छापे टाकतायत. लोकांना काय देणं-घेणं आहे? सत्य परिस्थिती सांगतो, जे लोक तुम्हाला मतदान करतात, त्यांचे आभार माना. कारण त्यातले एक टक्का लोकही तुमच्याकडे काही कामासाठी येत नाहीत. उगीच संपर्क कार्यालय उघडून बसतात. कोण करणार तुला संपर्क? एकटा बसलेला असतो वाट बघत.
राज ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे :-
आम्ही सगळे वेडे सगळे.. दोन दिवसांपूर्वी कळलं की निवडणुका होत नाहीत. तर सगळे शांत लगेच. आता कुठे पेटवायची? आता काही उरलंच नाही आमच्याकडे पेटवायला. निवडणुका लांबणीवर पडणार हे मी नोव्हेंबरपासून सांगत होतो.