अक्षय आणि विद्याच्या 'भुलभुलैय्या' चित्रपटाचा सीक्वेल येणार

एखाद्या प्रसिद्ध चित्रपटाचा सीक्वेल बनवणं बॉलिवूडमध्ये काही नवीन नाही. आतापर्यंत अनेक चित्रपटांचे सीक्वेल आले आणि येत्या काळात येणार आहेत. आता यात आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. निर्माता भूषण कुमार देखील २००७ सालच्या ‘भुलभुलैय्या’ या सुपरहिट चित्रपटाचा सीक्वेल करणार असल्याचं समोर आलं आहे.

स्क्रिप्टवर काम सुरू

फरहाद सामजी हे या चित्रपटाचा सीक्वेल लिहिणार असून दिग्दर्शनही तेच करणार आहेत. सध्या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. त्यानंतर चित्रपटात कोणत्या अभिनेता आणि अभिनेत्रीची वर्णी लागेल हे निश्चित होईल. चित्रपटात नवीन चेहरे दिसण्याची शक्यता आहे

भुलभुलैय्या सुपरहिट 

भूषण कुमार यांच्या ‘टी सीरिज’ या निर्मिती संस्थेनं ‘भुलभुलैय्या २’ हे नाव नोंदवल्यानंतर ही बातमी समोर आली आहे. प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केलेला 'भुलभुलैय्या' हा मुळात २००५ चा तमिळ चित्रपट ‘चंद्रमुखी’चा रिमेक आहे. चंद्रमुखी हा चित्रपटदेखील १९९३ च्या ‘मणीचित्रथाझु’ या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. अक्षय कुमार, विद्या बालन आणि शाइनी अहुजा यांच्या अभिनयामुळे आणि चित्रपटातील गाण्यांमुळे भुलभुलैय्या सुपरहिट ठरला होता.


हेही वाचा

टायगर बनणार बायचुंग भुतीया

'गुलाबो सिताबो'साठी अमिताभ-आयुष्यमान प्रथमच एकत्र


पुढील बातमी
इतर बातम्या