अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि दिशा पटाणी(Disha Patani)च्या विरोधात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) गुन्हा दाखल केला आहे. कारण १ जूनला दुपारी २ वाजता ते दोघेही मुंबईतील बसस्टँडवर गाडीनं फिरताना पकडले गेले आहे. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता, ते कोणतेही ठोस कारण सांगू शकले नाही. त्यामुळे पोलिसांनी कागदपत्रे तपासून त्यांना सोडून दिलं.
मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांच्या विरोधात कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, अद्याप यामध्ये कोणालाही अटक करण्यात आली नाही. कारण हा जामीनपात्र गुन्हा आहे. राज्य सरकारनं काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनमध्ये वाढ करत १५ जूनपर्यंत वाढवले होते. यामध्ये सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंतच बाहेर पडण्याची परवानगी दिली आहे.
या कारवाईनंतर मुंबई पोलिसांनी भन्नाट ट्वीटही केलं. टायगर श्रॉफ व दिशा पटानीच्या चित्रपटांच्या शीर्षकांचा वापर पोलिसांच्या ट्वीटमध्ये करण्यात आला आहे. 'करोनाविरुद्ध सध्या 'वॉर' सुरू आहे. अशा युद्धाच्या काळात वांद्र्याच्या रस्त्यावर 'मलंग'गिरी करणं दोन कलाकारांना महागात पडलं आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १८८, ३४ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळं कोविड १९ चे नियमांचं उल्लंघन होईल असं काही करू नका. विनाकारण 'हिरोपंती' करणं टाळा,' अशी विनंती पोलिसांनी मुंबईकरांना केली आहे.
माध्यमांच्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी दिशा पटाणी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांना मंगळवारी एका चेक पाइंटवर अडवले होते. दरम्यान, ते दोघेही जिममधील सत्र संपवल्यानंतर ड्राईव्हवर बाहेर पडले होते.
दिशा पुढच्या सीटवर बसलेली होती तर टायगर मागच्या बाजूला बसला होता. मुंबई पोलिसांनी यावेळी त्या दोघांची आधार कार्ड तपासत इतर औपचारिक गोष्टी पूर्ण करत त्यांना सोडून दिलं होतं.
यापूर्वी, हे जोडपं कोरोना काळात मालदीवमध्ये सुट्टीसाठी गेले होते. ते काही दिवसांपूर्वी सुट्टीवरून परत आले.
टायगर आणि दिशा २०१६ पासून रिलेशनशिपमध्ये असल्याची अफवा आहे. पण ते फक्त चांगले मित्र असल्याचं सांगतात. त्यांनी २०१८ बागी २ चित्रपटात एकत्र काम केलं आहे.
हेही वाचा