मंगळवार, ८ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं की, फेब्रुवारीच्या अखेरीस मुंबई अनलॉक होईल. त्या पुढे म्हणाल्या की, अधिकारी यासाठी सज्ज आहेत. परंतु, लोकांनी मास्क घालणं तसंच सामाजिक अंतर पाळणं महत्वाचे आहे.
लोकमत या वृत्तवाहिनीनं दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या आठवड्यात कोरोना स्थितीचा आढावा घेऊन निर्बंध शिथिल करण्याबद्दलचा निर्णय घेतला जाणार असल्याचं मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं.
मुंबई महापालिकेनं निर्बंधातून सूट देण्याचा विचार सुरू केला आहे. मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात असून, आसपासच्या शहरांमधील परिस्थितीदेखील नियंत्रणात राहिल्यास आम्ही कोविड टास्क फोर्सशी संवाद साधू. त्यानंतर सध्या लागू असलेले थोडे निर्बंधदेखील शिथिल होतील. पुढील आठवड्यापर्यंत निर्बंध हटवण्याची परवानगी मिळेल, असंही काकाणी यांनी सांगितलं.
मुंबईतील कोरोना परिस्थितीची माहिती टास्क फोर्ससमोर ठेवू. त्यावर अंतिम निर्णय राज्य सरकार घेईल. कोरोना रुग्णांची कमी होणारी संख्या पाहता फेब्रुवारीत मुंबई अनलॉक होऊ शकते. मात्र यानंतरही मुंबईकरांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करावं लागेल, असंही काकाणी म्हणाले.
हेही वाचा