महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाच्या साखळीला तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात बुधवार १४ एप्रिल २०२१ रात्री ८ वाजेपासून संचारबंदीची घोषणा केली आहे. ही संचारबंदी किमान पुढील १५ दिवसांसाठी असेल. या कालावधीत कलम १४४ लागू करण्यात येईल. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतरांना सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास सक्त मनाई असेल.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवार रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. पुन्हा एकदा संचारबंदी आणि कडक निर्बंध लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. संचारबंदीची घोषणा करतानाच मुख्यमंत्र्यांनी विविध घटकांसाठी ५ हजार ४०० कोटी रुपयांचं आर्थिक पॅकेजही जाहीर केलं आहे.
काय सुरू, काय बंद?
संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा बंद राहतील. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळून इतरांना योग्य कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई असेल. अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू राहण्यासाठी मुंबई लोकल ट्रेन, रेल्वे सेवा, बस सेवा इत्यादी सार्वजनिक वाहतूक सुरूच राहील. मात्र या वाहतूक सेवेचा वापर केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना करता येईल.
रिक्षा, टॅक्सी, बस सेवा या काळात निम्म्या क्षमतेसह सुरू राहतील. सोबतच खासगी कार्यालये, दुकाने, बाजारपेठा बंद राहतील.
पावसाळ्याआधीची कामे या काळात सुरूच राहतील.
बँका, सेबी, सेबीने मान्यता दिलेली कार्यालये, दूरसंचार सेवा आणि संबंधित देखभाल सेवा सुरू राहतील.
अधिसूचनाधारक पत्रकारांना मुभा असेल.
पेट्रोल पंप सुरू राहतील
हॉटेल, रेस्टॉरंट, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते यांच्याकडून केवळ होम डिलिव्हरी, टेक अवे सेवा सुरू राहील.
त्याशिवाय वैद्यकीय सेवा, वाहतूक सप्लाय चेन, लस उत्पादक आणि वाहतूक करणारे, मास्क, जंतूनाशक उत्पादक आणि वितरक, वैद्यकीय कच्चा माल निर्मिती करणारे कर्मचारी, जनावरांचे दवाखान्यातील कर्मचारी, शितगृहे, वेअर हाऊसिंग, विविध देशांची राजनैतिक कार्यालये, ई-कॉमर्स, शासकीय आणि खासगी सुरक्षा मंडळे, आयटी सेवा सुरू राहणार आहेत.