कोरोनाचे रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत. त्यात मुंबईतील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत नागरिकांना कोरोना नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे.
महापौर म्हणाल्या की, २० हजारांचा आकडा क्रॉस झाला, तर केंद्राच्या नियमानुसार राज्य सरकार आणि महापालिका या नियमांची पूर्तता करेल, असा इशारा त्यांनी लॉकडाऊनबाबत दिला. शिवाय महापालिका आयुक्त इक्बाल चहल हे स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
त्या पुढे म्हणाल्या की, ओमिक्रॉनला घाबरू नका. मात्र, सारे चिंताजनक आहे. लॉकडाऊन असताच कामा नये. आत्ता सगळे सावरतायत. लॉकडाऊनमुळे सर्वांचे कंबरडे मोडले आहे. आपण प्रत्येकानं ठरवलं तर लॉकडाऊन टाळता येईल. गर्दी करणार नाही, गर्दीत जाणार नाही, असा निर्धार करा. घरातील सर्वांचे लसीकरण करा. मास्क काढणार नाही. बसमध्ये काय सगळीकडेच नियम पाळेन. मास्क न लावता फिरणार नाही. आपल्यामुळे इतरांचे हाल होणार नाहीत, याची काळजी घ्या, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
शिवाय मुंबईमध्ये कोरोनाचे वाढणारे रुग्ण पाहता शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. आता पहिली ते नववीचे वर्ग ऑनलाईन सुरू राहतील. शिवसेनेने स्वतः दोन कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यामुळे तुम्हीही मोठी गर्दी आणि कार्यक्रम जरूर टाळा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
हेही वाचा