ऐतिहासिक विजयामुळे बीसीसीअायकडून खेळाडूंसह प्रशिक्षकांना बोनस

ऑस्ट्रेलियाच्या भूमीत कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली पहिल्यांदाच भारतीय संघाने तब्बल ७२ वर्षांनी कसोटी मालिका जिंकून नवा इतिहास रचला. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा भारत हा पहिला आशियाई संघ ठरला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत २-१ ने विजय मिळवल्यानं भारतीय संघाला बीसीसीआयनं बक्षिसांचा वर्षाव केला आहे. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघातील खेळाडू आणि प्रशिक्षकांना बीसीसीआयने इनाम जाहीर केले आहेत. 

प्रत्येक कसोटीसाठी १५ लाख

बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने मंगळवारी बक्षीस जाहीर केले. भारतीय संघातील अंतिम अकरा खेळाडूंना प्रत्येक कसोटीसाठी १५ लाख रुपये मिळणार आहेत. त्यामुळं ज्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चारही सामन्यात संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे, त्यांना ६० लाख रुपयांचा बोनस मिळणार आहे. राखीव खेळाडूंना प्रत्येकी ७.५ लाख रुपये मिळणार आहेत. तसंच, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांसह अन्य प्रशिक्षकांना प्रत्येकी २५ लाख रुपये मिळणार आहेत.

२-१  फरकाने विजय

सिडनी कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियासमोर पहिल्या डावात ६२२ धावांचं लक्ष्य उभं केलं होतं. हे लक्ष्य पार करत असताना सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० धावांत गुंडाळून फॉलोऑन दिला. मात्र, पाचव्या दिवशी पावसामुळे खेळ सुरू होऊ शकला नाही. तसंच, उपहारानंतर देखील पावसानं विश्रांती न घेतल्यामुळे सामनाधिकाऱ्यांनी सामना अनिर्णित म्हणून जाहीर केला. त्यानंतर भारतानं चार सामन्यांची मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. या कसोटीत चेतेश्वर पुजाराला सामनावीर आणि मालिकावीराच्या किताबाने गौरवण्यात आलं.


हेही वाचा - 

ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारतानं कसोटी मालिका जिंकली


पुढील बातमी
इतर बातम्या