पालघर जिल्ह्यात जमावानं तीन प्रवाशांना चोर समजून दगडानं ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हल्ल्यात सामील असलेल्या १०१ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.पालघरच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे गुरुवारी 16 एप्रिल रोजी रात्री ही घटना घडली होती.
पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात चोर फिरत असल्याची अफवा मोठ्या प्रमाणावर पसरली होती. त्यामुळे येथीन लोक धस्तावले होते. अशातच गुरूवारी रात्री दाभाडी-खानवेल मार्गावरून तिघे मारुती इको गाडीतून नाशिकच्या त्र्यंबकेश्वरकडे जात होते. यावेळी शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर जमा झाले. त्यांनी ही कार थांबवत प्रवाशांची विचारपूस करण्यास सुरुवात केली. मात्र प्रवाशांनी माहिती देण्याच्या आधीच काही लोकांनी गाडीच्या दिशेने दगडफेक सुरू केली. त्यानंतर या जमावाने कारमधील तिघांनाही लाठ्याकाठ्यांनी बेदम चोप दिला. यावेळी या तिघांनी जीव वाचवण्यासाठी गयावया करत पळण्याचा प्रयत्नही केला. मात्र, चोरांचं भूत डोक्यात घुसलेल्या या ग्रामस्थांनी काहीही न ऐकता या तिघांनाही जीव जाईपर्यंत मारलं.