मुलांची हत्या करून आईची आत्महत्या, परळमधील घटना

परळच्या बेस्ट वसाहतीत राहणाऱ्या रेवती कामेरकर (३७) या महिलेने मुलांची हत्या करत स्वतः गळफास घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मानसिक त्रासाला कंटाळून तिने हे कृत्य केल्याचं समजतं. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांना या तिघांच्या मृतदेहाजवळ तीन पानांची सुसाईड नोट मिळाली आहे. 

फोनला प्रतिसाद नाही

भोईवाडाच्या परळ येथील बेस्ट काॅलनीत रेवती कामेरकर ही पती संदीप आणि दोन मुले शुभम (१६) आणि रिशा (४) यांच्यासह राहत होती. संदीप हे बेस्टमध्ये कामाला असून ते मंगळवारी सकाळी ८ वाजता नेहमी प्रमाणे घराबाहेर पडले. ११.३० वाजता संदीप यांनी रेवतीला फोन केला असता तिने फोन उचलला नाही. त्यानंतर संदीप यांनी काही वेळाने पुन्हा ५ वेळा फोन केले. मात्र रेवती फोनला प्रतिसाद देत नसल्यामुळे संदीपने शेजारी फोन केला. शेजारी रेवतीकडे गेले असता आतून दरवाजा बंद होता. रेवतीकडून घरातून काहीच उत्तर मिळत नसल्याने शेजाऱ्यांनी ही बाब संदीपच्या कानावर घातली. 

कुणालाही जबाबदार धरू नये

 संदीपने घराच्या दिशेने धाव घेत पोलिसांनाही पाचरण केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी रेवती यांनी घराच्या फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं तर मुले निपचीत पडल्याचं दिसून आलं. पोलिसांनी तिघांना तातडीने रुग्णालयात नेले. मात्र डाॅक्टरांनी तिघांना तपासून मृत घोषीत केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेवतीने मुलांना विषारी औषध देऊन त्याची हत्या करत, मग आत्महत्या केली.  पोलिसांना रेवतीजवळ मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये तिने उचललेल्या पावलाला कुणालाही जबाबदार धरू नये असं म्हटलं आहे. मानसिक तणावातून ही आत्महत्या केली असल्याचे तिने म्हटलं आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलिस अधिक तपास करत आहेत. 


हेही वाचा - 

एकटेपणामुळे वृद्धेची तर तक्रारीच्या भितीने विद्यार्थ्याची आत्महत्या


पुढील बातमी
इतर बातम्या