नोव्हेंबर २००५ पासून लागू केलेली नवीन पेन्शन योजना शिक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारी आहे. १२ वर्षे आंदोलन करूनही शिक्षकांच्या पदरी निराशाच पडली आहे. त्यामुळे शिक्षकांना पुन्हा जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
नवीन पेन्शन योजनेत शिक्षकांना निवृत्तीनंतर कोणते फायदे मिळणार? हे स्पष्ट केलेले नाही. एकाच शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांना जुनी आणि नवीन पेन्शन योजना आहे. या विरोधात अनेक वेळा आंदोलने करण्यात आली आहेत. शिक्षकांसह सरकारी कर्मचारी अनेकदा याविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. जुन्या पेन्शन योजनेंतर्गत अनेक फायदे शिक्षकांना मिळत होते. मात्र नव्या पेन्शन योजनेंतर्गत हे फायदे बंद करण्यात आले आहेत.
राज्यातील आमदारांच्या पेन्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ केली जात असून १२ वर्षांपासून जुन्या पेन्शनसाठी लढणाऱ्या शिक्षकांच्या तोंडाला मात्र सरकार पाने पुसत असल्याचा आरोप अनिल बोरनारे यांनी केला असून सरकारने याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन राज्यातील शिक्षकांना जुनी पेन्शन योजना सुरू करावी.
अनिल बोरनारे, अध्यक्ष शिक्षक परिषद
हेही वाचा -