महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणारी दहावीची परीक्षा गुरूवारपासून सुरू झाली. या परीक्षेसाठी राज्यभरातून १७ लाख ५१ हजार ३५३ विद्यार्थी, तर मुंबईतून ३ लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
बारावीचा परीक्षेचा पेपर व्हॉट्सअॅपवरुन फुटल्यानंतर यंदाच्या बारावीच्या परीक्षांसाठी बोर्डाने तयार केलेले वक्तशीरपणाचे कडक नियम दहावीच्या विद्यार्थ्यांनाही लागू करण्यात आले आहेत. यात विद्यार्थ्यांना अकरानंतर परीक्षा केंद्रात येण्यास मज्जाव करण्यात येईल.
अपरिहार्य कारणास्तव ११ वाजून १० मिनिटांनी आलेल्या विद्यार्थ्यांना केंद्र संचालकांच्या, तर ११ वाजून २० मिनिटांनी येणाऱ्या विद्यार्थ्यांना विभागीय बोर्डाच्या परवानगीने परीक्षेला बसता येईल.
लेटकमर्स दहावीच्या विद्यार्थ्यांनाही बोर्डाच्या नव्या नियमाचा फटका बसू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेला येण्यासाठी अकरापर्यंतची वेळ पाळावी, असं आवाहन बोर्डाकडून करण्यात आलं आहे.