अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) यांचा बुधवारी दुपारी तीन वाजता मुंबईतील वर्सोवा येथील कब्रस्तानमध्ये दफनविधी पार पडला. यावेळी त्यांची दोन्ही मुले अयान आणि बाबिलशिवाय काही नातेवाईक आणि जवळचे मित्र उपस्थित होते.
नातेवाईकांसोबतच मिल्का सिंग, कपिल शर्मा, विशाल भारद्वाज उपस्थित होते लॉकडाउनमुळे जास्त लोक येऊ शकले नाहीत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांचे पार्थिव रुग्णालयातून थेट कब्रस्थानमध्ये आणण्यात आलं.
इरफान खानचं वयाच्या ५४व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचारादरम्यान त्यानं अखेरचा श्वास घेतला. रिपोर्ट्सनुसार, इरफानला पोटाचा त्रास झाला होता. त्याला कोलोन इन्फेक्शन झाले होते. गेल्या आठवड्याभरापासून आयसीयूत त्याच्यावर उपचार सुरु होते. पण आज अखेर त्याची प्राणज्योत मालवली. बॉलिवूडचा हा प्रतिभावंत कलाकार असा अचानक निघून गेल्यानं चाहते आणि बॉलिवूडकर यांना मोठा धक्का बसला आहे.
दिग्दर्शक शूजीत सरकार यांनी इरफान खानच्या निधनाची बातमी दिली आहे. त्यांनी ट्विट केले - ''माझा प्रिय मित्र इरफान, तू लढलास... आम्हाला तुझा कायम अभिमान राहिल, आपण पुन्हा भेटू. सुतापा आणि बाबिल यांचे सांत्वन करतो. तू मोठी लढाई लढलास. सुतापा या लढाईत तू तुझ्यापरीने जे करु शकली ते तू केले. ओम शांती. इरफान खानला सलाम.''
इरफान खान राजस्थानच्या टोंकमधील नवाबी कुटुंबातील होता. त्याचे बालपणही टोंकमध्ये गेलं. त्याचे आईवडील टोंकचे रहिवासी होते. आजही त्याचे नातेवाईक आणि कुटुंबातील बरेच लोक इथेच वास्तव्याला आहेत. चार दिवसांपूर्वीच (शनिवारी) जयपूर इथं त्याच्या आईचं निधन झालं. तब्येत बिघडल्यामुळे इरफान खान आईच्या अंत्यसंस्कारात सहभागी होऊ शकला नव्हता. व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून त्यानं आईचं अंत्यदर्शन घेतलं होतं.
जवळपास 30 वर्षांच्या करिअरमध्ये इरफाननं ५० हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं. ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘पानसिंग तोमर’, ‘द लंचबॉक्स’, ‘हैदर’, ‘गुंडे’, ‘पिकू’, ‘तलवार’, ‘हिंदी मीडियम’ हे त्याचे निवडक गाजलेले चित्रपट आहेत. त्याला हासिल (निगेटिव्ह रोल), 'लाइफ इन अ मेट्रो' (बेस्ट अॅक्टर), 'पान सिंह तोमर' (बेस्ट अॅक्टर क्रिटिक) आणि 'हिंदी मीडियम' (बेस्ट अॅक्टर) साठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. 'पान सिंह तोमर'साठी राष्ट्रीय पुरस्कारानं त्याला सन्मानित करण्यात आलं होतं.
बॉलिवूडसोबतच त्याने हॉलिवूडमध्येही छाप सोडली. कलाक्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीसाठी २०११ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता.
हेही वाचा