प्रसार भारतीचा मोठा निर्णय, PTI, UNI चं सबस्क्रिप्शन रद्द

प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI) आणि युनायटेड न्यूज ऑफ इंजिया (UNI) या प्रसिद्ध वृत्तसंस्थांशी असलेले व्यवसायिक संबंध संपुष्टात आणण्याचा निर्णय प्रसार भारतीनं घेतला आहे. हे वृत्त ‘इंडियन एक्सप्रेस’ने सूत्रांच्या हवाल्यानं प्रसारित करण्यात आलं आहे. भारत-चीन संघर्षासंदर्भातील बातम्या प्रसारित करण्याबाबतच्या मुद्द्यावरून प्रसार भारतीकडून हा निर्णय घेण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे.

इतर वृत्तसंस्थांकडून प्रसारभारती नवे प्रस्ताव मागवणार आहे. एका बोर्डाद्वारे देशातील सर्वातमोठी वृत्तसंस्था असलेली पीटीआय चालवली जाते. यामध्ये प्रमुख वर्तमानपत्रांच्या मालकांचा सहभाग असतो. ना नफा तत्वावर चालणारी पीटीआय ही ट्रस्ट आहे.

पीटीआयच्या सर्वात मोठ्या ग्राहकांपैकी प्रसार भारती हा एक आहे. दरवर्षी पीटीआयला प्रसार भारती ६ कोटी ७५ एवढी रक्कम देत असते. पीटीआय आणि यूएनआयला या संदर्भात प्रसार भारतीनं पत्र पाठवलं आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच पीटीआय आणि यूएनआयसह सर्वच वृत्तसंस्थांकडून प्रसार भारती प्रस्ताव मागवण्याची प्रक्रिया सुरू करेल. या वर्षी जून महिन्यात वृत्तसंस्थांद्वारे कथित राष्ट्रविरोधी वृत्त प्रसारित केल्यामुळे हे संबंध संपुष्टात आणल्याचं सांगत प्रसार भारतीने हे पत्र पाठवलं आहे.

चीनी राजदूत सून विडोंग यांची पीटीआयनं एक मुलाखत घेतली होती. विडोंग यांनी या मुलाखतीत भारत-चीन तणावाला भारताला दोषी धरलं होतं. पीटीआयला हे पत्र जूनमध्ये बोर्डाची बैठक होण्यापूर्वी पाठवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. पीटीआयच्या कथित राष्ट्रविरोधी वृत्तांकनाबाबत या पत्रात नाराजी व्यक्त करण्यात आली होती. पीटीआयचा संपादकीय दृष्टीकोन ठीक नसल्याचं प्रसार भारतीनं पत्रात स्पष्ट केलं.


पुढील बातमी
इतर बातम्या