मुसळधार पावसामुळे अंबरनाथमध्ये उद्यानाची भिंत कोसळली

कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर शहरात बुधवारी (६ ऑक्टोबर) संध्याकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे अंबरनाथमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. महालक्ष्मी नगर गॅस गोडाऊन परिसरात उद्यानाची भिंत कोसळली. यामध्ये २ जणांचा मृत्यू झाला आहे.

दुर्घटनेत ५ ते ६ घरांचं मोठं नुकसान झालं आहे. तसंच भिंतीखाली काहीजण अडकल्याची माहिती समोर आली होती. या घटनेची तातडीनं पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढलं. यावेळी २ जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं समोर आलं.

अंबरनाथ शहरात आज सायंकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अंबरनाथ पूर्वेतील गॅस गोडाऊन परिसरात असलेल्या उद्यानाच्या संरक्षक भिंतीखालची माती खचली आणि भिंत बाजूलाच असलेल्या बैठ्या घरांवर कोसळली.

घटनेत पाच ते सहा घरांचं मोठं नुकसान झालं. तसंच काही गाड्या देखील भिंतीखाली दबल्यानं गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला. या भिंतीचे अवशेष बाजूला करत असतानाच या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली २ जण दबले असल्याचं समोर आलं. या दोघांनाही बाहेर काढून तपासलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

या घटनेनंतर अंबरनाथ नगरपालिका प्रशासन, अग्निशमन दल, यांच्यासह नायब तहसीलदार यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला सुरुवात केली. या भिंतीचे ढिगारे उचलण्याचं काम अंबरनाथ नगरपालिकेकडून तातडीने हाती घेण्यात आलं आहे.

दुसरीकडे, कल्याणमध्ये जोरदार वाऱ्यामुळे द्वारली गावात दोन झाडे कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका रिक्षासह घराचे नुकसान झालं आहे. सुदैवानं या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही.


हेही वाचा

मुंबईतल्या ७ सरोवरांमधील पाण्याची पातळी ९९ टक्क्यांहून अधिक

येत्या ४ ते ५ दिवसांत राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

पुढील बातमी
इतर बातम्या