मुंबईत पालिकेला कोरोना रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी रोखण्यात यश आलं आहे. मुंबईत रुग्णांच्या वाढीचा वेग मंदावत असल्याचा निष्कर्ष केंद्र शासननियुक्त समितीने काढला आहे. मुंबईत रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग आता १० दिवसांवर गेला आहे. आधी ८.३ दिवस असा असलेला रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी १७ ते २७ एप्रिल दरम्यान दहा दिवसांवर गेला आहे. देश पातळीवर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी ९.५ दिवस आहे. तर राज्याचा कालावधी ८.९ दिवस आहे.
केंद्रीय समितीने हाजीअली ते वरळी, वरळी ते धारावी, चर्नी रोड ते धारावी, जे.जे. रुग्णालय ते चिंचपोकळी या विभागांसह विलेपार्ले ते ओशिवरा, सांताक्रूझ ते जोगेश्वरी(पूर्व), सांताक्रूझ ते धारावी आणि चुनाभट्टी ते पवई या समूह विभागातील १७ ते २७ एप्रिल या काळातील रुग्णसंख्येचे विश्लेषण केलं आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर हा राज्याच्या मृत्यू दरापेक्षा कमी असल्याचे निरीक्षणही नोंदविले आहे. राज्याचा मृत्यूदर दर शंभर बाधित रुग्णांमागे सरासरी ४.३ आहे. तर मुंबईत तो सरासरी ३.९ टक्के झाला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील बाधित रुग्णांचा मृत्युदर सरासरी ६.३ टक्के एवढा होता.
मुंबईतील करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत होती. मात्र, फिरते फिवर क्लिनिक, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिकांची तपासणी, कंटेन्मेंट झोन सील करणं, कुणालाही घरातून बाहेर पडण्यास मनाई करणं, अत्यावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडताना मास्कशिवाय घराबाहेर पडण्यास मज्जाव करणं, फिजिकल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणे पालन करणं आदी विविध उपयायोजना पालिकेने आधीपासूनच मुंबईत सुरू केल्या होत्या. त्याचा परिणाम म्हणून रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढवण्यात पालिकेला यश आलं आहे.
हेही वाचा -
बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर यांचं निधन