डोंबिवलीहून २० मिनिटांत ठाणे गाठा, मेपर्यंत पूल खुला होणार

डोंबिवली-माणकोली उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून मे अखेरीस या पुलाचे लोकार्पण केले जाणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. या पुलामुळे डोंबिवलीतून केवळ २० मिनिटांत ठाणे गाठणे शक्य होणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

डोंबिवली पश्चिमेकडून बाहेर पडण्यासाठी सद्यस्थितीत वाहनचालकांना डोंबिवली पूर्वेकडे येत कल्याण शिळमार्गे कल्याण किंवा मुंब्रा बायपास मार्गाने ये जा करावी लागत आहे. संपूर्ण शहराला वळसा घालण्यात वाहनचालकांना दीड ते दोन तासांचा वेळ लागतो. यामुळेच पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करत वाहनचालकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. राजनोलीपासून सहा किमी आधी ठाण्याच्या दिशेने माणकोलीजवळ हा पूल उभारला जात आहे. या पुलामुळे ठाणे-डोंबिवली हे अंतर अवघ्या २० मिनिटांवर येणार आहे.

ठणे ते भिंवडी रस्त्याचे रुंदीकरणदेखील वेगाने सुरू असल्याने वाहनचालकांना डोंबिवली ते ठाणे वाहतूक कोंडीमुक्त प्रवास करणे शक्य आहे. एमएमआरडीएकडून कमीत कमी कालावधीत या पुलाचे काम पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

शहरात पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी २०१३ मध्ये डोंबिवली, मोठागाव ते भिंवडीतील माणकोली असा उल्हास नदीवर १२२५ मीटर लांब व २७.५ मीटर रुंद पूल प्रस्तावित करण्यात आला होता. या पुलासाठी भूसंपादनासह इतर अडचणी उद्भवल्याने या पुलाचे भूमिपूजन होण्यासाठी १८ सप्टेबर २०१६ पर्यंत प्रतीक्षा करावी लागली. नंतर या पुलाचे काम सुरू झाले असले तरी भूसंपादनाची प्रक्रिया अडथळा ठरली होती.


हेही वाचा

सीएसएमटीजवळील हिमालय पादचारी पूल प्रवाशांसाठी सुरू

वर्सोवा पुलाची एक लेन वाहतुकीसाठी खुली, मुंबई-सुरत प्रवास सुखकर

इतर बातम्या