मराठा आरक्षणाचं राजकारण करू नका, आंदोलकांचा नेत्यांना इशारा

सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील मराठा नेत्यांनी मराठा आरक्षणाचं राजकारण करू नये नाहीतर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा कडक इशारा मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला आहे. मराठा आरक्षणाचं विधेयक गुरूवारी सभागृहात मांडलं जाणार असून यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतभेद सुरू आहेत. तर दुसऱ्या बाजूला मराठा आंदोलकांना अडवून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत आहे. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने इशारा देत आरक्षण मिळाल्याशिवाय आझाद मैदानावरून हलवणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे.

केवळ आश्वासन

मराठा आरक्षणासह इतर १९ मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाचं गेल्या कित्येक महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. या मागण्यांवर सरकारकडून मात्र आश्वासनच आंदोलकांच्या पदरी पडत आहे. त्यामुळं आता मराठा क्रांती मोर्चानं 'करो या मरो' म्हणत आंदोलन तीव्र केलं आहे. त्यानुसार आझाद मैदानावर मराठा आंदोलक सोमवारपासून ठिय्या मांडून आहेत.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलक आझाद मैदानावर येण्यासाठी निघत आहेत. सरकारने आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू केली असताना दुसरीकडे मराठा बांधवांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. त्यामुळं सरकारच्या या दुटप्पी भूमिकेवरही मराठा क्रांती मोर्चानं नाराजी व्यक्त केली आहे.

आमरण उपोषण

आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन सुरू असतानाच कोल्हापूरसह अन्य ठिकाणी मराठा समाजाकडून आमरण उपोषणही सुरू करण्यात आलं आहे. न्यायालयात टिकेलं असं आरक्षण मिळावं ही मागणी आहेच. पण त्याचवेळी ४० शहिदांच्या कुटुंबातील एकाला नोकरी आणि १० लाख रुपये मिळावेत यासह अन्यही १९ मागण्या आहेत. त्यामुळे आरक्षणाबरोबरच या १९ मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असं मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विरेंद्र पवार यांनी ठणकावलं आहे.


हेही वाचा-

मराठा आरक्षण: विरोधकांच्या मनात खोटं, मुख्यमंत्री सभागृहात आक्रमक

आरक्षण मिळेपर्यंत आझाद मैदानावरून माघार नाही; मराठा क्रांती मोर्चाचा निर्धार


पुढील बातमी
इतर बातम्या