मुंबई - प्रभांग क्रमांक 220 मधल्या बुथ क्रमांक 28 ची वोटिंग मशीन सकाळी 7.30 ते 7.55 वाजेपर्यंत बंद होती. त्यामुळे मतदार हैराण झाले होते. सकाळी गर्दी नसते म्हणून आलो. पण सकाळपासून मशीन बंद आहे. आमच्यासाठी बसायला जागा देखील केलेली नाही, अशी नाराजी उषा माडलिया यांनी व्यक्त केली. तर पक्षातील कार्यकर्त्यांनी आधी मशीन बघितल्या नव्हत्या का? नागरिकांना मतदान करताना किती त्रास होतो हे त्यांनी पाहणे गरजेचे आहे, अस मत व्यक्त करत जय माडलिया यांनी नाराजी व्यक्त केली.
बांद्रा पश्चिमेकडील सेंट पीटर स्कूलमध्येही मतदारांचा प्रचंड गोंधळ पहायला मिळाला. या शाळेत मतदान करण्यासाठी येणाऱ्यांचे मतदार यादीत नाव नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मतदारांमध्ये नाराजी पहायला मिळाली. मतदानासाठी आल्यानंतर हे तुमच मतदान केंद्र नाही, असे निवडणूक कर्मचाऱ्यांनी सांगितलं. दरवर्षी याच केंद्रातून मतदान करत असताना यंदा हा गोंधळ का? असा प्रश्न या मतदारांना पडला. त्यानंतर आजूबाजूचे केंद्र शोधून काढले. पण तेथेही नाव न सापडल्याने अनेक मतदार मतदान न करताच गेले. या प्रकारामुळे वैतागलेल्या मतदारांनी निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर सडकून टीका केली आहे.