ईशान्य मतदारसंघ रामदास आठवलेंसाठी सोडा - आरपीआय

 ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार शिवसेनेच्या टोकाच्या विरोधामुळे भाजपाने अद्याप जाहीर केलेला नाही. या मतदारसंघातील विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेनेचा तीव्र विरोध असून त्यांच्या उमेदवारीस विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर हा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाचे (आरपीआय) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासाठी सोडावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाने केली आहे. 

वाद मिटवण्यासाठी 

रिपब्लिकन पक्षाचे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर आणि मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ईशान्य मुंबई मतदारसंघाचा वाद मिटवण्यासाठी हा मतदारसंघ आठवले यांच्यासाठी सोडावा अशी मागणी केली. किरीट सोमय्यांना भाजपाने उमेदवारी देऊ नये अशी मागणी शिवसेनेने केल्याने ईशान्य मुंबईमधून महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ भाजपाने मन मोठे करून रिपब्लिकन पक्षासाठी सोडल्यास संपूर्ण देशभरात चांगला संदेश जाईल. या मतदारसंघातील शिवसेना आणि युतीचा टोकाचा वाद मिटवायचा असेल तर हा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला सोडावा अशी मागणी रिपब्लिकन  पक्षाने केली आहे. 

रामदास आठवले तयार 

ईशान्य मुंबईतून लढण्यास रामदास आठवले यांची तयारी असल्याचं महातेकर आणि सोनवणे यांनी म्हटलं आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी रामदास आठवले यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराबाबत चर्चा केली असून  भाजपा शिवसेना आरपीआय महायुतीच्या प्रचाराला रिपब्लिकन पक्षाने सुरुवात केली आहे. हा मतदारसंघ आंबेडकरी जनतेचा बालेकिल्ला आहे असंही अविनाश महातेकरांनी सांगितले.


हेही वाचा -

भाजपाकडून सभांचा सपाटा; महिन्याभरात घेणार १ हजार सभा

मी निवडणूक लढवणार ‘ही’ तर निव्वळ अफवा- माधुरी दीक्षित


पुढील बातमी
इतर बातम्या