'आपल्या देशात लोकशाही आहे, त्यामुळे पंतप्रधान होण्याची भूमिका मांडण्याचा अधिकार राहुल गांधींना आहे. त्याची कुणी खिल्ली उडवू नये', असा सल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे. तसेच, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी याच अधिकारातून पंतप्रधान झाले असले, तरी अडवाणी व्हायला हवे होते,' असे सांगत संजय राऊत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधींच्या मदतीला धावले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
काँग्रेस देशात आजही सर्वात मोठा पक्ष आहे. २०१४ ला मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला. राहुल गांधींच्या भूमिकेवर युपीएतील घटक पक्ष काय ते ठरवतील. आम्हाला शरद पवार लायक उमेदवार वाटतात. मोदी, जेटली, अडवाणी या प्रत्येकात क्षमता आहे, असे ते यावेळी म्हणाले. खुर्चीवर बसल्यावर सर्वांमध्येच क्षमता येत असल्याचे सांगत राहुल गांधी यांच्या भूमिकेचे त्यांनी यावेळी समर्थन केले.
भाजपमध्ये गोंधळ आहे. आधी बसू मग बोलू. शिवसेनेच्या निर्णयावर कुणी दबाव आणू शकणार नसल्याचे जाहीर करत स्वबळावर निवडणूक लढवणे ही उद्धव ठाकरे यांची भूमिका असून ती स्पष्ट असल्याचा पुनरूच्चारही त्यांनी यावेळी केला.
'पालघरची जागा भाजपची असती, तर त्यांना काँग्रेसचा उमेदवार भाड्यानं घेण्याची वेळ आली नसती', अशी बोचरी टीका करत ज्यांनी वनगांविरुद्ध निवडणूक लढवली, त्यांना तुम्हाला उमेदवारी का द्यावी लागली? हा जनतेच्या मनातला सवाल असल्याचेही त्यांनी सांगितले.
छगन भुजबळ फक्त राजकीय विरोधक आहेत. मात्र आमच्यात व्यक्तिगत शत्रुत्व नाही. हे महाराष्ट्राने बघितले आहे. बाळासाहेबांची साथ ज्यांनी सोडली, त्या प्रत्येकाची वाताहत झाली. मनी लॉण्ड्रिंगचा आरोप असलेला पी चिदम्बरम यांचा मुलगा कार्ति आठ दिवसांत जामीनावर तुरुंगाबाहेर येतो, मग भुजबळ यांना अडीच वर्षे का लागली? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
'छगन भुजबळ आज शिवसेनेत असते, तर त्यांच्यावर ही वेळ अली नसती' अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. तसेच 'भुजबळ यांनी आता फक्त आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी' असा सल्लाही त्यांनी दिला.
हेही वाचा