ganeshotsav 2021: एसटी महामंडळाच्या गणपती विशेष गाड्यांना प्रवाशांची पसंती

दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाकडून प्रवाशांसाठी विशेष बसगाड्या सोडण्यात येतात. स्वस्त व सुरक्षित प्रवास व्हावा या हेतुनं अनेक प्रवासी महामंडळाच्या एसटीच्या प्रवासाला पसंती देतात. त्यामुळं प्रवाशांची मागणी लक्षात घेत, यंदाही एसटी महामंडळानं विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई परिसरातून जाणाऱ्या १ हजार १५ जादा गाड्यांपैकी ३४० बस आरक्षित झाल्या आहेत. यात गट आरक्षणाच्या गाड्याही आहेत. गणेशोत्सवानिमित्त एसटीच्या जादा गाड्यांबरोबरच मध्य रेल्वेकडूनही ४० किंवा त्यापेक्षा जादा गाड्या सोडण्याची तयारी करण्यात आली आहे.

कोकणात जाण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या गणपती विशेष गाड्यांच्या आरक्षणाला प्रतिसाद वाढू लागला आहे. गणेशोत्सवाला १० सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. त्यानुसार, एसटी महामंडळानं मुंबई, ठाणे, पालघरमधून जाण्यासाठी व कोकणातून येण्यासाठी २,२०० जादा बसगाडय़ांची घोषणा केली. या बस ४ सप्टेंबरपासून सुटतील. १६ जुलैपासून जाण्याचे व परतीचेही आरक्षण सुरू झाले आहे. 

मुंबई, ठाणे व पालघरअंतर्गत  विविध आगारांतून सुटणाऱ्या प्रथम एक हजार १५ जादा गाड्या आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यातील गट आरक्षणाच्या १०० बस आणि स्वतंत्र आरक्षणाच्या २४० गाड्या आरक्षित झाल्या आहेत.

यंदा झालेली इंधनदरवाढ यामुळे गणेशोत्सवानिमित्त कोकणात खासगी टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सने जाणाऱ्यांच्या खिशाला काहीशी कात्रीही लागू शकते. मुंबई बस मालक संघटनेचे सचिव हर्ष कोटक यांनी गेल्या वर्षी याच काळात डिझेलचा दर प्रति लिटर ७० रुपये होता. तोच आता १०० रुपयांपर्यंत गेला. इंधन दरवाढ ही परवडणारी नाही. तसेच गेल्या वर्षीही गणेशोत्सवात उत्पन्न नव्हते. त्यामुळे यंदा गणेशोत्सवकाळात खासगी बसचे भाडे २० टक्क्यांनी वाढविण्यात येणार असल्याची माहिती मिळते.

आणखी ४० जादा रेल्वेगाड्या गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेने ७२ रेल्वेगाड्या सोडण्याची घोषणा केली असून त्याच्या आरक्षणाला  प्रतिसाद मिळाला आहे. आणखी ४० किंवा त्यापेक्षा जादा गाड्या सोडण्याचाही निर्णय घेतला असून लवकरच त्याची घोषणा होणार असल्याची माहिती मिळते.

पुढील बातमी
इतर बातम्या