गोरेगावमध्ये दीड वर्षांचा चिमुरडा नाल्यात पडून वाहून गेल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री घडली. या मुलाचा अजूनही शोध लागलेला नाही. त्यातच घटनास्थळी गेलेल्या महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना स्थानिकांच्या संतापाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मुंबईकरच गटारांची झाकणं उघडी ठेवतात असं म्हणत या घटनेला मुंबईकरांनाच जबाबदार ठरवलं.
"काल घडलेली घटना दुर्दैवी आहे. एकाच ठिकाणी तो नाला उघडा होता. यासंबंधीचे चौकशीचे आदेश आम्ही दिले आहेत. गटार स्थानकांनी तोडलं होतं की प्रशासनानेच झाकण बसवलं नव्हतं हे पाहणं गरजेचं आहे. अशा घटना घडू नये हे बघण्याची जबाबदारी जशी महापालिका प्रशासनाची आहे, तशीच मुंबईकरांचीही आहे. महापालिकेकडून वारंवार विनंती करुनही मुंबईकर कचरा टाकण्यासाठी अनेकदा गटारांची झाकणं उघडी ठेवतात. मुंबईकरांना सिव्हिक सेन्स असायला हवा."
दिव्यांश धानसी हा दीड वर्षांचा मुलगा बुधवारी रात्री १०.२४ वाजता गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरील इटालियन कंपनीजवळील आंबेडकर चौकातील एका नाल्यात पडला. घरातून खेळता खेळता दिव्यांश रस्त्यावर आला. रस्त्याच्या कडेलाच हा नाला होता. घरी जाण्यासाठी दिव्यांश मागे वळत असताना पाय घसरून नाल्यात पडला. नाल्यातील वाहत्या पाण्यासोबत तो बंद गटारात खेचला गेल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजमध्ये दिसलं.
तेव्हापासून बचाव पथक या चिमुकल्याचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी महापालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त करत रास्तारोको केला.
हेही वाचा-
२ वर्षांचा मुलगा पडला मॅनहोलमध्ये, ९ तास उलटले तरी शोध सुरूच
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठ्यात वाढ