मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पडत असलेल्या अवकाळी पावसामुळं नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. अशातच आता हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळं ६ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान जालं आहे. यामध्ये आता आणखीनच भर पडणार आहे.
मागील १० ते २० दिवसांपासून राज्यभरात सतत पडणाऱ्या पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला दुष्काळाचं सावट निर्माण झालेल्या मराठवाडा, विदर्भात आता परतीच्या पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, उडीद, बाजरी आदी पिकांचं मराठवाड्यात मोठं नुकसान झालं आहे. तसंच, विदर्भातील खरीप पिकांबरोबरच रब्बी पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या महा चक्रीवादळामुळं बुधवारपासून म्हणजे ६ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबरपर्यंत उत्तर कोकणसह उत्तर मध्य महाराष्ट्रातील विविध भागांत मेघगर्जनेसह अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्यामुळं समुद्रामध्ये वाऱ्याचा वेग अधिक असणार असल्यानं मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रात गेलेल्या मच्छिमारांना पुन्हा किनाऱ्यावर येण्याच्या सूचना सरकारनं दिल्या आहेत. तसंच योग्य त्या उपाययोजनांसह सज्ज राहण्याच्या सूचना संबंधित विभागातील सर्व यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. मदतीसाठी मंत्रालयातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आलं आहे.
हेही वाचा -
शपथविधीसाठी भाजपाने बुक केले वानखेडे स्टेडियम
शिवसेनेच्या नाटकात काँग्रेसने पडू नये - संजय निरुपम