बोरिवलीत पूर्ववैमन्यस्यातून अंबादास लक्ष्मण शिंदे या रिक्षाचालकाची त्याच्या तीन साथीदारांनी हत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी बोरिवली पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला असून तिन्ही आरोपींचा शोध सुरू केला आहे. बॅनरवर नाव न टाकल्याच्या वादातून ही हत्या झाल्याचं बोललं जात अाहे.
बोरिवलीच्या शिंपोली येथील झोपडपट्टीत रिक्षा ड्रायव्हर असलेला शिंदे राहत होता. अनेक सराईत गुन्ह्यात हात असल्याने पोलिसांनी त्याला यापूर्वी तडीपार केलं होतं. त्यानंतर शिंदे पुन्हा परिसरात रिक्षा चालवू लागला होता. त्याच परिसरात राहणाऱ्या रिक्षा चालकांची बोरिवलीत युनियन आहे. या युनियनतर्फे काही दिवसांपूर्वी पूजा आणि कार्यक्रम अायोजीत केला होता. त्यावेळी छापण्यात आलेल्या बॅनरवर शेतियार या भावकीतील सदस्यांची नावे टाकण्यात आली नव्हती. त्यामागे शिंदेचा हात असल्याचा संशय शेतीयार यांना होता.
सोमवारी रात्री शिंदे आणि शेतियार अाणि भावकीतील लोक दारू पिण्यासाठी बसले होते. त्यावेळी याच विषयावरून त्यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर शेतीयार यांनी शिंदे याच्यावर चाकू हल्ला करून त्याची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शिंदेचा मृतदेह शवविच्छेदनास पाठवून पोलिसांनी शेतीयार भावांविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला. या प्रकरणी पोलिस शेतीयार भावांचा शोध घेत आहे.
हेही वाचा -
कौटुंबिक वादाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न, लोकांनी वाचवलं