काँग्रेसच्या ऑफिसची तोडफोड केल्याप्रकरणी सध्या आर्थर रोड तुरूंगात बंद असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि अन्य ७ कार्यकर्त्यांना आणखीन काही दिवस तुरूंगात रहावं लागणार आहे. यामागचं कारण म्हणजे बुधवारी देशपांडे यांच्यासहित सर्व अटकेतील मनसैनिकांचा जामीन अर्ज किल्ला कोर्टाने फेटाळला आहे.
''या गुन्ह्याचा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर आला आहे. त्यामुळे तुम्हाला बाहेर ठेवल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो'', असं म्हणत किल्ला कोर्टाने सर्वांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
किल्ला कोर्टाने जामीन नाकारल्यानंतर वरच्या कोर्टात दाद मागणार असल्याचं यावेळी मनसेच्या वकिलांनी सांगितलं.
शुक्रवारी आझाद मैदान येथील मुंबई काँग्रेस ऑफिसच्या तोडफोडप्रकरणी देशपांडे यांच्यासह ७ जणांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. शनिवारी त्यांना किल्ला कोर्टात हजर केल्यावर कोर्टाने त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर सगळ्यांना आर्थर रोड तुरूंगात न्यायलायींन कोठडीत पाठवण्यात आलं.
या मनसे कार्यकर्त्यांमध्ये संदीप देशपांडे, विशाल कोकणे, संतोष धुरी, अभय मालप, सरोदे दिवाकर पडवळ, योगेश छिले, हरीश सोलंकी यांचा समावेश आहे. सगळ्यांना दंगल, ट्रेसपासिंग त्याचबरोबर तोडफोडकेल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.