१६ व्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य’ मध्ये मुंबई विद्यापीठानं बाजी मारली आहे. ७ ते ११ डिसेंबर २०१८ दरम्यान यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथं आयोजित करण्यात आलेल्या या युवा महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाची विजयी मोहोर उमटली आहे. विशेष बाब म्हणजे आतापर्यंत मुंबई विद्यापीठानं तब्बल १५ वेळा हा चषक राखण्याचा बहुमान मिळवला आहे.
वाड्मय, ललितकला, संगीत, नाट्य आणि नृत्य या स्पर्धांमध्ये विजयी सलामी देत सांस्कृतिक युवा महोत्सवामध्ये ८७ गुणांची कमाई करत अव्वल स्थान पटकावलं आहे. द्वितीय क्रमांक प्राप्त झालेल्या विद्यापीठास एकूण ४८ गुण मिळाले असून राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सवात एकूण १९ विद्यापीठ सहभागी झाली होती.
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत्रातील विविध महाविद्यालयातील वक्तृव, वाद-विवाद, रांगोळी, मातीकाम, पाश्चिमात्य समूह गायन, एकांकिका, मूक अभिनय, शास्त्रीय नृत्य आणि लोकनृत्य या विभागांमध्ये प्रथम पारितोषिक मिळवलं आहे. यासोबत विविध स्तरावरील सर्वसाधारण चषकांमध्ये ललितकला विभाग, संगीत विभाग, नाट्य विभाग आणि नृत्य विभागात प्राविण्य मिळवले आहे. विशेष म्हणजे सुजेश मेनन याला गोल्डन बॉय तर श्रावणी महाजनी या विद्यार्थीनीला गोल्डन गर्लचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं आहे.
ललितकला विभागासाठी डॉ. बालाजी भांगे, संगीत विभागासाठी सिद्धेश जाधव, सुमित चाचे, विजय जाधव, नाट्य विभागासाठी निलेश गोपनारायन, महेश कापरेकर, सागर चव्हाण, नृत्य विभागासाठी वैभव सतरंगे, अमोल बावकर आणि निलेश सिंग यांचं सहकार्य लाभलं आहे. या स्पर्धेचं नियोजन सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे आणि विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील यांनी केलं होतं. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी आणि कुलसचिव डॉ. सुनिल भिरूड यांनी विजयी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा -
शिक्षणात मानवी मुल्यांचा समावेश व्हावा- दलाई लामा