मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रातील समस्या मांडणारे ट्विट एका विद्यार्थीनं केलं आहे. या विद्यार्थ्यांनं मांडलेल्या समस्यांमध्ये उपकेंद्रातील विद्यार्थ्यांच्या स्वच्छतागृहाची अतिशय घाणेरडी अवस्था झालेली पाहायला मिळत आहे. या समस्यांबाबत विद्यार्थिनीनं शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या ट्विटर अकाऊंटवर केलं होतं. या ट्विटची आदित्य ठाकरे यांनी दखल घेतली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्य डॉ. सुप्रिया करंडे आणि युवासेना कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे यांनी विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राला भेट दिली. त्यावेळी मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रातील निराशाजनक चित्र समोर आलं.
ठाणे उपकेंद्राच्या संपूर्ण परिसरात अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलं आहे. दुरस्थ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. विद्यार्थ्यांना ठाणे उपकेंद्राकडून ओळखपत्र देण्यात आलेलं नाही. पुरेशी वीज व्यवस्था या ठिकाणी नाही. बीएमएस (BMS), बीबीए(BBA), एमबीए(MBA), एलएलबी(LLB) च्या अभ्यासक्रमाचं इंटीग्रेटेड पद्धतीनं सुमारे ४०० विद्यार्थी इथं शिक्षण घेत आहेत.
या उपकेंद्राच्या संचालिका सुनिता मगरे या २ आठवड्यातून फक्त एकदा येतात. विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या मांडणारं पत्र मार्च २०१९ रोजी त्यांना दिलं होतं. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. विद्यार्थ्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी त्या कधीच हजर नसतात, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. विद्यार्थ्यांच्या या म्हणण्यावरून संचालकांचं त्यांच्या कामाकडं दुर्लक्ष होतं असल्याचं स्पष्ट होत आहे.
मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रामध्ये विद्यार्थ्यांची अशा पद्धतीनं शैक्षणिक हेळसांड होणं, हे अतिशय दुर्दैवी आहे. या सर्व गोष्टींची दखल घेत युवासेनेनं, ठाणे उपकेंद्रासाठी पूर्णवेळ संचालक नेमावेत आणि स्वच्छतागृहाची नीट व्यवस्था राखण्यासाठी ‘हाऊस किपींग एजन्सी ( Housekeeping Agency)’ ची नेमणूक करावी, अशी मागणी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्याकडं केली आहे.
हेही वाचा -
मुंबईतील 'या' रुग्णालयातील व्हेंटिलेटर बंद
विधानसभा निवडणुकीमुळं पहिल्या सत्रातील परीक्षांच्या वेळापत्रकावर परिणाम