गेल्या ३ महिन्यांपासून मुंबईसह राज्याला कोरोना व्हायरसनं चांगलचं टार्गेट केलं आहे. दररोज रुग्णांच्या संख्येत होणाऱ्या वाढीमुळं लॉकडाऊनचा काळही वाढवण्यात येत आहे. त्यामुळं अनेक कंपन्यांच, नोकरवर्गाचं नुकसान झालं आहे. अशातच आता आ लॉकडाऊनमुळं राज्यातील सणांवर गदा येण्याची शक्यता आहे.अगामी काळात राज्यात गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईला प्रमुख मानलं जातं. परंतु, याच मुंबईला कोरोनानं घेरल्यामुळं गणेशोत्सावर संकट येण्याची शक्यता आहे. असं असलं तरी मुंबईत गणेशोत्सव साजरा होणारच याबाबत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती ठाम आहे.
अनेक वर्षांपूर्वी राज्यात सर्वत्र प्लेगची साथ असताना,लोकांनी अक्षरशः घरातील गणरायाच्या छोट्या मूर्ती, फोटो पुजल्याच्या आठवणींना उजळा देत मुंबईकरांनी विशेषतः सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीदेखील यंदाचा गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याबाबत मानसिक तयारी करावी,असं आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी केलं असून, या आवाहनाला अनेक मोठ्या मंडळांनीदेखील सहमती दर्शवली आहे.
मुंबईच्या गणेशोत्सवाची चर्चा जगभर होते. प्लेगची साथवगळता गणेशोत्सव काळात अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या. मात्र, मुंबईचा गणेशोत्सव नेहमीच थाटामाटात साजरा झालेला पाहायला मिळाला आहे. मात्र, यंदा कोरोनाने जगभर घातलेला धुमाकूळ पाहता, एकूणच मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवावर अनिश्चिततेचे सावट आहे. अनेक नामांकित मंडळांनी 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतली आहे. मात्र, शहरात संचारबंदी लागू असल्यामुळे मूर्तिकारांच्या कार्यशाळांतील लगबग देखील सध्या शांत आहे.
याबाबत 'मुंबईवर ओढवलेले संकट पाहता यंदाचा गणेशोत्सव अगदी साधेपणानं साजरा करण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. गणेशोत्सव हा गर्दीचा सण असून, गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग लक्षात घेत भाविकांसह, कार्यकर्त्यांचे जीव धोक्यात घालणं योग्य नाही. यापूर्वीदेखील मुंबईतील गणेशोत्सवानं अनेक कठीण प्रसंगांमध्ये सामाजिक भान जपले आहे. गतवर्षीची अतिवृष्टी असो वा २६ जुलैचा महापूर, मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी नेहमीच यंत्रणांच्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे. यंदाही ही परंपरा मंडळांनी कायम राखली आहे. मागील काही दिवसांत पालिका, पोलिस यंत्रणेवर अधिक ताण आहे. अशावेळी ऐन गणेशोत्सवात याच सामाजिक जाणिवेतून गर्दी टाळण्याचं आवाहन करणार आहे', असं समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी म्हटलं.