गुढीपाडव्यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात नववर्ष स्वागत यात्रेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या डोंबिवली श्री गणेश संस्थानची नववर्ष स्वागत यात्रा यंदा साधेपणाने करण्याचा निर्णय आला आहे.
निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर ही स्वागत यात्रा साधेपणाने करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अध्यक्ष राहुल दामले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यंदा कोणत्याही प्रकारचे देखावे असणारे रथ या नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होणार नसून साधेपणानं श्री गणेशाच्या पालखीच्या माध्यमातून काढली जाणार आहे.
भागशाळा मैदानाऐवजी डोंबिवली पश्चिमेच्या पंडित दिनदयाळ मार्गावरील मारुती मंदिरापासून ही पालखी निघणार आहे. तर यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजेच ७५ वे वर्ष असून त्याचे औचित्य साधून संस्कार भारतीतर्फे ७५ कलाकार वेगवेगळ्या ठिकाणी अत्यंत सुबक अशा ७५ रांगोळ्या काढणार आहेत.
ढोलपथकांना यात्रेत परवानगी नाही. चौकाचौकात वाजवायला परवानगी दिली जाणार आहे. मात्र याबाबत ढोल पथकांनी नियोजन करायचं आहे.
मराठी नववर्षाची स्वागत यात्रा आणि डोंबिवली हे समीकरण आहे. गुढीपाडव्याला निघणारी शोभायात्रा ही डोंबिवलीची सांस्कृतिक ओळख आहे. कोरोनाच्या निर्बंधांमध्ये शिथिलता आल्याने डोंबिवलीकरांनी दोन वर्षांनंतर स्वागत यात्रा काढण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली होती.
शोभायात्रा संदर्भात डोंबिवली श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे विश्वस्तांची एक बैठक पार पडली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत यंदा गुढीपाडव्याला नववर्ष स्वागत यात्रा काढली जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं.
हेही वाचा