''या प्रकल्पाला इतके कोटी खर्च केले, त्या प्रकल्पाला एवढे कोटी आणले, म्हणत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी केवळ हवेत फू फू करून बुडबुडे सोडतात'', अशी उपरोधीक टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात केली होती. या टीकेला उत्तर देताना गडकरी यांनी आपण विविध प्रकल्पांचा २५ पानी अहवाल राज यांना पाठवल्याचं म्हटलं खरं; परंतु मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी असा कुठलाही अहवाल मिळाला नसल्याची माहिती देत गडकरी यांना शुक्रवारी प्रतिटोला हाणला.
राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता अक्षय कुमार यांच्यासह गडकरींवर तोंडसुख घेतलं होतं. लहान मुलं साबणाच्या बाटलीतून जसे फू फू करत बुडबुडे सोडतात, त्याप्रमाणं गडकरी कुठेही गेले की एखाद्या प्रकल्पासाठी १ लाख कोटी, दुसऱ्या प्रकल्पासाठी २ लाख कोटी खर्च केल्याचं सांगतात. हे केवळ हवेतले पोकळ बुडबुडे असल्याचंही म्हणत राज यांनी त्यांच्यावर टीका केली.
या टीकेला उत्तर म्हणून आपण आतापर्यंत महाराष्ट्रात कुठं-कुठं आणि किती प्रकल्प आणले-राबवले, किती रस्ते बांधले, त्यासाठी किती निधी मंजूर केला, प्रकल्प-रस्ते किती दिवसांत तयार झाले यासंबंधीचा सविस्तर अहवाल पाठवल्यांच जाहीर केलं. महाराष्ट्रात रस्त्यांसाठी २ लाख ८२ हजार कोटी, बंदर विकासासाठी ७० हजार कोटी आणि सिंचन प्रकल्पांसाठी ७५ हजार कोटी मंजूर झाल्याचं या अहवालात नमूद असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं.
हा अहवाल राज ठाकरेंना पाठवल्याचं गडकरींचं म्हणणं असलं, तरी हा अहवाल मिळाला नसल्याचं नांदगावकर यांना सांगितलं. हा अहवाल मिळाल्यास नक्कीच आम्ही त्याचा अभ्यास करू आणि मग त्यावर काय म्हणणं मांडायचं ते मांडू, असंही नांदगावकर यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे राज ठाकरे आणि गडकरी यांच्यात पुढचे काही दिवस तरी फू-फू चालणार हे नक्की.
हेही वाचा-
देशातला मीडिया मोदीनियंत्रीत- राज ठाकरे