सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसी मुद्द्यावरुन देशभरात वादंग पेटलं आहे. या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक समुदायाच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बुधवारी भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी अल्पसंख्याक समुदायाला संयम ठेवण्याचं आवाहन केलं.
कृष्णकुंज निवासस्थानी अल्पसंख्याक धर्मगुरू ,विचारवंत आणि पक्षातील अल्पसंख्याक समाजातील पदाधिकारी यांच्या सोबत राज यांनी चर्चा केली. सरकारला जे हवे आहे ते करू नका, सरकारला मंदी वरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी ह्या गोष्टी घडवून आणायच्या आहेत, असं यावेळी राज म्हणाले. आंदोलन, जाळपोळ, दंगली हे त्यांना हवेच आहे आणी जे त्यांना हवे आहे ते आपण का करावे? असाही सवला राज यांनी यावेळी उपस्थित केला. सरकार किती लोकांना अटक करु शकते? अख्या देशाला कैदेत ठेवणार का? म्हणून सांगतो, ते काहीच करू शकणार नाहीत, तितकी यंत्रणा ही नाही म्हणून संयम ठेवा, असं राज यांनी आवाहन केलं.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनास दिल्लीत मंगळवारी हिंसक वळण लागले. आंदोलकांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केल्याने पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. शांततेत मोर्चा सुरू असताना गर्दीतून पोलिसांवर दगडफेक सुरू झाली. काही आंदोलकांनी पोलिसांना मारहाण सुरू केली. त्यामुळे पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. नंतर ड्रोनद्वारे पाहणी करून पोलिसांनी काही जणांना ताब्यातही घेतले. या भागात गस्त घालण्यास सुरुवात केली. जमावाने दोन दुचाकी पेटवून दिल्या.