घाटकोपर - रविवारी हुतात्मा बाबू गेनू यांच्या स्मृतीदिनानिमित्त एका ज्योतरॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. हुतात्मा बाबू गेनू यांच्या आठवणी तरुण पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी ही रॅली काढण्यात आली होती. रविवारी सकाळी ७ वाजता ही रॅली काळबादेवीपासून, चिरागनगर, कार्तोडीपाडा, भटवाडी, आणि अमृतनगर या भागांतून फिरली. नंतर वाशी, सानपाडा, लोणावळा, आंबेगावमार्गे ही रॅली महाळुंगे या गेनू यांच्या गावी सोमवारी 12 डिसेंबरला पोहोचणार आहे. या रॅलीच्या माध्यमातून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातो. ब्रिटिशांच्या राजवटीत मुंबईत परदेशी मालाची विक्री करणाऱ्यांची दुकानं बंद करण्यात बाबू गेनू यांनी पुढाकार घेतला होता. 12 डिसेंबर 1930 रोजी परदेशी मालाला विरोध करत त्यांनी मुंबईच्या काळबादेवी बाजारात कपड्यांनी भरलेला एक ट्रक अडवला होता. ट्रक अंगावरून गेल्यानं ते चिरडले गेले आणि उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.