गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठीही टोलमाफी देणार, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं. त्यानुसार आज महाराष्ट्र सरकारने आदेश जारी केला आहे. गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना टोलमाफी जाहीर केली आहे.
त्यासाठी गणेशभक्तांना आरटीओ कार्यालयातून ‘टोल पास’ घ्यावा लागणार आहे. २७ ऑगस्टपासून हा आदेश लागू होणार आहे. आरटीओ कार्यालयातून घेतलेला ‘टोल पास’ दाखवून भाविक कोकणात जाऊ शकतात.
२७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग व इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवर असणाऱ्या टोल नाक्यांवरून जाण्याऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. पण यासाठी आरटीओ कार्यालयात ‘टोल पास’ घेणं अनिवार्य आहे.
यासोबतच "गणेशोत्सव 2022, कोकण दर्शन" अशा स्वरुपाचे स्टीकर्स स्वरुपाचे टोलमाफी पासेस त्यावर गाडी क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर त्यावर नमूद करुन ते स्टीकर्स परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधीत प्रादेशिक परिवहन विभाग यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. ऑफिसेस मध्ये उपलब्ध करुन देण्यात यावेत. तसेच या पासेस परतीच्या प्रवासाकरीता ग्राह्य धरण्यात येतील.
ग्रामीण वा शहरी पोलीस / प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्यामार्फत दिल्या जाणाऱ्या पासेसची संख्या बाबतीत एकत्रित माहिती उपसचिव (खा. र. 1) सार्वजनिक बांधकाम विभाग, चौथा मजला, मंत्रालय, मुंबई. ३२ यांना माहितीकरिता सादर करावी.
पोलीस आणि परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती जनतेस होण्याकरिता आवश्यकतेप्रमाणे अधिसूचना जाहीर प्रसिध्दी करावी. तसेच या सूचना सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणण्यात याव्यात.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.
यावर्षी 31 ऑगस्ट 2022 रोजी बाप्पाचे आगमन होत आहे. तर 9 सप्टेंबर 2022 रोजी अनंत चतुर्दशीला दहा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे. गणेश उत्सवानिमित्त गणेशभक्त मोठ्या प्रमाणावर कोकण व गोवा या भागात जाण्यासाठी खासगी व प्रवासी वाहनांचा वापर करतात. आता या गणेशभक्तांनी वाहनांची कागदपत्रे सादर केल्यावर त्यांना टोलमधून सूट मिळणार आहे.
हेही वाचा