Advertisement

बेस्ट खरेदी करणार ७२३ नवीन बस

तोट्यात चालणाऱ्या बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी बेस्टकडून बेस्टच्या तिकीटदरात आणि वीजदारात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. प्रत्यक्षात मात्र बेस्ट तिकीट दरवाढ आणि वीजदरवाढीचा उल्लेखच अर्थसंकल्पात नव्हता. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बेस्ट खरेदी करणार ७२३ नवीन बस
SHARES

बेस्ट उपक्रमाचा २०१९-२० आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प अखेर सोमवारी सादर करण्यात आला. तोट्यात चालणाऱ्या बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी बेस्टकडून बेस्टच्या तिकीटदरात आणि वीजदारात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. प्रत्यक्षात मात्र बेस्ट तिकीट दरवाढ आणि वीजदरवाढीचा उल्लेखच अर्थसंकल्पात नव्हता. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. अर्थसंकल्पातील तरतूदीनुसार बेस्ट या आर्थिक वर्षात ७२३ नवीन बस खरेदी करणार आहे.


किती कोटींचा अर्थसंकल्प?

एकूण ६०७५.६८ कोटींचा अर्थसंकल्प बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक डाॅ. सुरेंद्र बागडे यांनी बेस्ट समितीच्या सभेत सादर केला. २०१९-२० साठीच्या या अर्थसंकल्पात ७२० कोटी ५३ लाखांची तूट दर्शवण्यात आली असून भांडवली खर्चासाठी ४५२ कोटी ३४ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.


प्रस्तावच नाही

दिवसेंदिवस खालावत चाललेली बेस्टची आर्थिक स्थिती लक्षात घेता बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी बेस्टच्या भाडेवाढीसह वीज दरवाढीचा पर्याय बेस्टकडून पुढं आणण्याची शक्यता व्यक्त होत होती. पण भाडेवाढ आणि वीजदरवाढीचा कोणताही प्रस्ताव नसल्यानं अशी कोणतीही तिकीट दरवाढ आणि वीजदरवाढ झाली नसल्याची माहिती बेस्ट समितीचे सदस्य अनिल कोकीळ यांनी दिली आहे.




७२३ नव्या बस खरेदी करणार

दुसरीकडे बेस्टने प्रवाशांच्या सोयीसाठी नव्याकोऱ्या ७२३ बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. चालू आर्थिक वर्षात या बस खरेदी करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक ती आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.


प्रवाशांसाठी मोबाईल अॅप

बेस्ट थांब्यावर बेस्ट बसची वाट पाहत प्रवाशांना तासनतास ताटकळत उभं रहावं लागतं. प्रवाशांची ही गैरसोय दूर करत त्यांना बसची अचूक वेळ कळावी यासाठी 'इंटेलिजेंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेन्ट सिस्टीम' (आयटीएमएस) नावाने खास प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यानुसार बस आगार, बस स्थानक आणि बसचौकी येथील वाहतूक प्रवर्तनात्मक कार्याचं संगणकीकरण करण्यात येईल. त्यामुळे वाहतूक विभाग आणि अभियांत्रिकी विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन बसप्रवर्तनात सुधारणा होणार असल्याचं दावा करण्यात येत आहे.


उद्घोषणेद्वारे माहिती

या संगणकीय प्रणालीमुळं बस मार्गावर कार्यरत असलेल्या बसगाड्यांची आणि बसमार्गाची माहिती अचूक वेळेसह प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. पॅसेंजर इन्फाॅर्मेशन सिस्टीम (पीआयएस)द्वारे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसचं स्थळ तसंच येणाऱ्या बसथांब्यांची माहिती उद्घोषणेद्वारे मिळणार आहे. याच प्रकल्पाद्वारे प्रवाशांसाठी मोबाईल अॅप तयार करत त्याव्दारे बस प्रवर्तनाची अर्थात बस कुठं आहे आणि किती वेळात, कोणत्या बसथांब्यावर पोहोचेल हे समजणं सोपं होणार आहे.



हेही वाचा-

पुन्हा भाडेवाढ? बेस्टचा अर्थसंकल्प होणार सादर

हे' आहे मुंबईतील सर्वांत महागडं शौचालय!



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा