अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणाने तळ गाठल्याने बुधवार, 19 जूनपासून अंबरनाथकरांना एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मंगळवारी याबाबतचा निर्णय जाहीर केला. अंबरनाथ शहराला बारवी धरण, बदलापुरातील उल्हास नदीवरील बॅरेज बंधारा इथून पाणी दिले जाते.
अंबरनाथमधील सुमारे एक लाख लोकवस्तीला चिखलोली धरणातून दररोज सहा दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. तर अंबरनाथमधील मोठ्या भागाला बदलापूर येथील बॅरेज बंधारा आणि बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो.
दुसरीकडे बदलापूर शहरातही हेंद्रेपाडा येथील जलवाहिनीला मंगळवारी गळती लागल्याने बुधवारी पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला. तर गुरुवारीही काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिली आहे.
ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारावी धरणात पाणीसाठा 25 टक्क्यांपर्यंत खाली आलेला आहे. तर अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणानेही तळ गाठला आहे. त्यामुळे मंगळवारी अंबरनाथ शहराचे पाणी व्यवस्थापन पाहणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चिखलोली धरणातून ज्या भागात पाणीपुरवठा केला जातो त्या भागात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जाहीर केला.
बुधवार, 19 जून पासून याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. त्यामुळे चिखलोली धरणातून पूर्वेतील ज्या भागात पाणी दिले जाते त्या भागातील नागरिकांना पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे लागणार आहे. ऐन पावसाळ्यात पाणी कपात झाल्याने नागरिकांसमोर मोठे आव्हान आहे.
हेही वाचा