Advertisement

इथे काही इंचांवर वाट पहातोय मृत्यू!


इथे काही इंचांवर वाट पहातोय मृत्यू!
SHARES

तुम्ही जर जीटीबी नगरमधल्या ब्रिजवरुन जात असाल, तर सावध रहा. कारण इथे अवघ्या काही इंचांवर साक्षात मृत्यू तुमची वाट पहातोय! काही मिनिटांतच खेळ खल्लास! विश्वास बसत नाहीये ना? आम्ही हे म्हणतोय, त्याला कारणही तसंच आहे.

जीटीबी नगरमधल्या पादचारी पुलावर हाय व्होल्टेज विद्युत तारा लटकलेल्या आहेत. ब्रिजच्या दोन्ही बाजूला विद्युत वाहिनीच्या डीपी आहेत. ज्यामधून हजारो व्होल्टचा करंट सतत वाहत असतो. ब्रिजवर लटकणाऱ्या तारा जर खालून जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावर पडल्या, तर त्यातून गंभीर घटना घडू शकते. शिवाय हा ब्रिज लोखंडाचा आहे आणि लोखंडातून सहज विद्युत प्रवाह प्रवाहित होऊ शकतो. त्यामुळे अशा वेळी पुलावर उभ्या असणाऱ्या सर्वच पादचाऱ्यांना हाय व्होल्ट विजेचा झटका बसून मोठी दुर्घटना घडू शकते. त्यातच आता पावसाळा सुरु झाल्यामुळे या ब्रिजवर शॉर्ट सर्किट होण्याचा धोकाही वाढला आहे.


मी रोज या ब्रिजवरून ये-जा करतो. गेल्या अनेक दिवसांपासून या वायरी अशाच अवस्थेत आहेत. त्यात आता पावसामुळे वायरचा शॉक कधी लागेल याचीच भीती असते

संकेत कांबळे, स्थानिक रहिवासी

कुर्ला चुनाभट्टी या मार्गावरुन जाणाऱ्या रेल्वे रुळाच्या मधोमध हा ब्रिज आहे आहे. मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली असताना रेल्वेकडून मात्र प्रवाशांच्या सुरक्षेबाबत अशा प्रकारचा निष्काळजीपणा दाखवला जात आहे. हा पादचारी पूल रेल्वे जवळील असल्याने प्रतीक्षानगर व सायन या मार्गाला ही जोडतो. त्यामुळे या पादचारी पुलावर मोठ्या संख्येने लोकांची वर्दळ सुरु असते. त्यात या वायरी अशा प्रकारे लटकणे हा नागरिकांच्या जिवाशीच खेळ असल्याची भावना स्थानिक व्यक्त करत आहेत.



विद्युत तारेमधून झालं होतं स्पार्किंग...

जीटीबी नगरमधल्या या ब्रिजवरुन जाणाऱ्या तारांमधून दोनच दिवसांपूर्वी स्पार्किंग झाल्याचं स्थानिक सांगतात. ही घटना घडल्यानंतर स्थानिकांमध्ये या ब्रिजवरुन जाण्याबद्दल भीतीची भावना आहे. मात्र अजूनही रेल्वे प्रशासनाकडून या लटकणाऱ्या वायरींबाबत काहीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.


रेल्वे प्रशासनाची उदासीनता आणि आश्वासनं...

दरम्यान, 'मुंबई लाइव्ह'च्या टीमने याचा पाठपुरावा करण्यासाठी जीटीबी रेल्वे स्थानक गाठलं. मात्र, दाद मागण्यासाठी कोणीही रेल्वे अधिकारी तिथे उपस्थित नव्हता. तिथल्या रेल्वे कर्मचाऱ्यांकडे या समस्येबाबत विचारणा केली असता, या वायरीचे काम लवकरात लवकर केले जाईल असं रेल्वे कर्मचारी अक्षय कांबळे यांनी सांगितलं.

गेल्या अनेक दिवसांपासून या लटकणाऱ्या वायरी अशाच अवस्थेत आहेत. त्याकडे ना रेल्वे प्रशासनाचं लक्ष आहे, ना वीजपुरवठा कंपनीचं. पण प्रशासनाच्या या अक्षम्य दुर्लक्षाचा भुर्दंड जर कुठल्या स्थानिकाला पडला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? या प्रश्नाचं उत्तर मात्र कुणाकडेही नाही.



हेही वाचा

जीटीबी स्टेशनला 'कोळीवाडा' नाव देण्याची मागणी



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा