महावितरणची (maha vitran) विद्युत पुरवठा करणारी बहुतांश यंत्रणा खारी जमीन असलेल्या जागेतून गेल्याने पावसाळ्यात तांत्रिक अडचणी येतात.
या तांत्रिक अडचणीतून सुटका व्हावी यासाठी महावितरणने जुने विद्युत खांब बदलून त्याठिकाणी नवीन मोनोपोल (monopole) उभारणीचे काम सुरू केले आहे. शहरात 278 ठिकाणी असे खांब उभे केले जाणार आहेत.
वसई विरार (virar) शहरात महावितरण कडून वीज पुरवठा केला जातो. वीज पुरवठा करणाऱ्या काही वाहिन्या या खारी जमीन असलेल्या जागेतून गेल्या आहेत. अशा ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते.
एखाद्या वेळी पावसाळ्यात वादळी वारे व इतर आपत्कालीन परिस्थितीत वाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड होण्याच्या घटना घडतात. अशा वेळी त्या ठिकाणी जाऊन दुरुस्ती करणे महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी जिकरीचे काम असते.
त्यामुळे वीज दुरुस्तीचे काम करताना विलंब होऊन अधिक काळ शहरातील वीज पुरवठा खंडित राहतो.या समस्येतून सुटका व्हावी यासाठी मोनोपोल उभारणी करण्याची कामे हाती घेतली आहेत.
यापूर्वी पहिल्या टप्प्यात महावितरणने शंभरहून अधिक ठिकाणी मोनोपोल उभारले होते. तर आता दुसऱ्या टप्प्यात ही आणखीन जुने खांब बदली करून त्या ठिकाणी नव्याने मोनोपोल लावले जाणार आहेत. यात नॉन एमआयडीसी परिसरात 140, नालासोपारा (nala sopara) परिसर 72, आणि विद्युत चार्जिंग स्टेशन या भागासाठी 66 असे एकूण 278 ठिकाणी मोनोपोल उभारणी केली जाणार आहे.
मोनोपोल उभारणीचे काम ही सुरू केले गेले आहे. तसेच त्या खांबांवर वीज वाहक तारा बसवण्याची कामे केली जाणार असल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांनी सांगितले आहे.
खारी जमीन आहे त्याठिकाणी या खांबांची विशेषतः गरज होती. त्याचे काम टप्प्याने सुरू आहे. जसे काम पूर्ण होईल तसा वीज पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल असेही खंडारे यांनी सांगितले आहे.
नवीन मोनोपोल सुरूवातीला जे जुने खांब होते त्याही पेक्षा उंच आहेत. त्याची उंची जवळपास 15 मीटर इतकी आहे. विशेषतः खारी जमीन दलदलीची असल्याने जुने खांब कोसळून पडण्याची भीती होती.
हे खांब उभारताना त्यात काँक्रिटकरणाचा एक मजबूत कॉलम तयार करून त्यावर तो खांब उभा केला जात आहे. यामुळे मोनोपोल पडण्याची भीती कमी आहे. याशिवाय त्यावर चढून दुरुस्तीचे काम करणे ही सोपे जाणार आहे.
तर दुसरीकडे पोलची उंची असल्याने लोंबकळत्या विद्युत वाहक तारांचा धोका ही कमी होणार आहे. वसई विरार शहरात दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थितीची समस्या उद्धभवते. या वीज व्यवस्थेवरही परिणाम होत असतो.
विशेषतः खारटन व पाणी साचलेल्या ठिकाणी वीज वितरण व्यवस्था कोलमडून पडते. तेव्हा त्याठिकाणी दुरुस्ती करताना अडचणी येतात. मोनोपोलमुळे तांत्रिक अडचणी कमी होण्याची शक्यता आहे. तरी एखादा बिघाड झाल्यास ते पूर्वी पेक्षा अधिक चांगल्या प्रकारे दुरुस्तीचे काम करू शकतील असे महावितरणने सांगितले आहे.