मुंबईत कोस्टल रोडच्या निर्मितीचं काम अत्यंत वेगाने सुरू आहे. या मार्गातील २ महाबोगदे खोदण्याचं काम सोमवारपासून सुरू झालं असून ‘मावळा’ टनेल बोअरिंग मशीनने हे २ महाबोगदे खोदले जाणार आहेत. या कामाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखवला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना २०१३ मध्ये कोस्टल रोड बांधण्याची कल्पना सुचली होती. त्यानंतर कोस्टल रोडच्या कामाचा आराखडा तयार करण्यात आला. या कामासाठी १२ हजार ७२१ कोटी रुपये करण्यात येणार आहेत.
महापालिकेच्या फंजिबल एफएसआयमधून ही रक्कम खर्च केली जात आहे. या कामासाठी आतापर्यंत १२८१ कोटी रुपये खर्च झाले आहेत. कोस्टल रोड हा प्रिन्सेस स्ट्रीट ते कांदिवली या दरम्यानचा एकूण ३५.६ किमी लांबीचा मार्ग आहे. याचा पहिला टप्पा प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज ते वरळी सी लिंक असा आहे.
कोस्टल रोडचा मार्ग गिरगाव चौपाटीखालून म्हणजे समुद्राखालून जाणार आहे. चौपाटीखाली दोन महाबोगदे तयार करण्यात येणार आहे. अरबी समुद्राखालील तब्बल १७५ एकर जमिनीवर भराव टाकण्यात आला आहे. तर अजून १०२ एकर समुद्राखालील जमिनीवर भराव टाकण्यात येणार आहे. इतकंच नाही तर या मार्गावर समुद्राखालून ४०० मीटरचे बोगदे असतील. हे काम मावळा मशीनद्वारे (टीबीएम) करण्यात येणार आहे. त्याला आज मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदिल दाखवला.
एक बटन दाबताच ही मावळा मशीन जमिनीच्या आत खंदक खोदायला सुरुवात करेल. समुद्राखाली सुरू असलेल्या या भुयारी मार्गाच्या कामाची मुंबईकरांना कल्पनाही येणार नाही आणि मुंबईकरांना या कामाचा त्रासही होणार नाही.
'मावळा' मशीन
प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटीपर्यंत २.०८२ किलोमीटरचे २ बोगदे तयार करण्यात येणार आहे. दीड वर्षात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी मावळा टनेल बोअरिंग मशीन वापरली जाणार आहे. या मशीनचा व्यास ३९.६ फूट इतका आहे. मशीनची लांबी ४०० मीटर आहेत. ही मशीन चीनमधून आणण्यात आली आहे. हे भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठ्या व्यासाचा टीबीएम मशीन आहे.
बोगद्याचा तयार केलेला व्यास ११ मीटर बोगद्यात सर्व सुरक्षेची व्यवस्था असेल. या टीबीएम मशीनला मावळा असं नाव देण्यात आलं आहे. महाबोगदा तयार करण्याचं काम मुंबई महापालिकेने हाती घेतलं आहे. एवढं मोठं काम हाती घेणारी मुंबई महापालिका एकमेव पालिका आहे. हे बोगदे खोदण्यासाठी मावळा आणला आहे. जगातील सर्वात मोठी मशीन आहे ही. या मशीनद्वारे दोन बोगदे खोदले जातील. ऑगस्टपर्यंत एका बोगद्याचं काम पूर्ण होईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.