वरळी - एसआरएच्यावतीनं वरळीच्या 2200 लोकांची झोपडपट्टी असलेल्या गोपाळनगर, हनुमाननगर, उद्योगनगर 1, उद्योगनगर 2, टिळकनगर झोपडपट्टी 2010 पासून 2014 पर्यंत तोडून पुनर्वसन करण्यात आली. झोपडपट्टीत पत्र्याच्या घरात राहणाऱ्या प्रत्येकाला 270 स्क्वेअर फूट जागा देऊन ओमकार बिल्डरने (बाबूलाल वर्मा) एलएनटीला कामकाज देत 23-23 मजल्यांच्या भव्य इमारतींचे बांधकाम केलं. मात्र फोटो पास उपलब्ध असल्यामुळे अनेक झोपडपट्टी धारकांना 3-4 रुम देखील या ठिकाणी मिळाल्या. महागाईच्या काळात अनेक लोकांनी योजनेअंतर्गत मिळालेल्या एक्स्ट्रा रुम विकल्या आहेत का? हे पाहण्यासाठी 5 ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशावरुन 3 डिसेंबरला या इमारतीत रहाणाऱ्या लोकांना नोटीस बजावण्यात आली. त्यानुसार वरळीच्या गोपाळनगर परिसरात सोमवारपासून सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात देखील झाली. परंतु सर्वेक्षणाच्या वेळी सदनिका ज्या व्यक्तीच्या ताब्यात आहे त्याला ओळखपत्र आणि पुरावे दाखवावे लागणार होते. त्यावेळी काहीसा गोंधळ झाल्यामुळे हे सर्वेक्षण थांबविण्यात आले आहे. 12 तारखेच्या गोंधळांनंतर पोलिसांच्या उपस्थितीत हे सर्वेक्षण होणार होते. परंतु अजून सुरुवातच न झाल्यामुळे आता सर्वेक्षण होणार का हा संभ्रम स्थानिकांमध्ये निर्माण झाला आहे.