दाऊदचा हस्तक इक्बाल मिर्चीच्या मालमत्तेवर ईडीची कारवाई

ट्रस्टच्या नावावर असलेली ही मालमत्ता इकबाल मिर्चीच्या नावावर करून देण्यासाठी तसेच मालमत्ता खरेदी करताना हारून आलम युसूफ आणि रणजितसिंग बिंद्रा यांची महत्त्वाची भूमिका होती.

दाऊदचा हस्तक इक्बाल मिर्चीच्या मालमत्तेवर ईडीची कारवाई
SHARES


कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा हस्तक आणि मुंबई बाँम्बस्फोटातील मुख्य आरोपी इक्बाल मिर्चीच्या मालमत्तेवर ईडीने कारवाईचा बडगा उगारला आहे. मिर्चीच्या वरळी येथील सीव्ह्यू, मरियम लॉज आणि राबिया मॅन्शन येथील १५३७ चौरस मीटर मालमत्तेवर ईडीने टाच आणली आहे. या प्रकरणात ईडीने मिर्चीचे सहकारी हारून आलम युसूफ आणि रणजितसिंग बिंद्रा या दोघांना शुक्रवारी अटक केली आहे. 

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपींपैकी इक्बाल मोहम्मद मेमन ऊर्फ इक्बाल मिरची हा एक आहे. १९९४ साली त्याला सरकारने तडीपार केले होते. दाऊद गँगचा अंमली पदार्थांचा व्यवसाय तो सांभाळत असे. त्याला पकडण्यासाठी इंटरपोलने देखील नोटीस जारी केली होती. १९९५ साली तो भारतातून विदेशात पळून गेला.  १९८८ पासून अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी तो मुंबई पोलिसांना हवा आहे. भायखळा येथे मिरचीच्या कुटुंबियांचा मिरची विकण्याचा व्यवसाय होता. त्यामुळेच त्याला गुन्हेगारी जगतात मिरची हे टोपणनाव मिळाले. अंमली पदार्थांच्या प्रामुख्याने मॅण्ड्रेक्स गोळ्यांच्या तस्करीत तो कुप्रसिद्ध आहे. भारतातून परागंदा झाल्यानंतर मिरचीने दुबईत आपले साम्राज्य निर्माण केले. दुबई, लंडन येथे बोगस नावाने वावरणा-या मिरचीच्या मालकीची दुबईत तीन-चार आलिशान हॉटेल्स असल्याचे सांगितले जाते. याशिवाय लंडनमध्ये इडन राईस मिल ही त्याचीच असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मुंबईतही मिरचीची बरीचशी मालमत्ता आहे. ही मालमत्ता कोर्टाने ताब्यात घेतली आहे. वरळी येथे तीन, माहिम येथे दोन आणि जुहू येथे एक असे फ्लॅटस मिरचीच्या मालकीचे असल्याचे सांगितले जाते. वरळीतील एकेकाळी कॅब्रे नृत्यासाठी प्रसिद्ध असलेला फिशरमॅन्स क्लोव्ह हा बारही मिरचीच्याच मालकीचा होता. याच मालमत्तांवर ईडीने टाच आणली.

मुंबईतील वरळी भागात सीव्ह्यू, मरियम लॉज आणि राबिया मॅन्शन येथील १५३७ चौरस मीटरची जागा खरेदी करताना या जागेचा गैरव्यवहार झाला होता. एका ट्रस्टच्या नावावर असलेली ही मालमत्ता इकबाल मिर्चीच्या नावावर करून देण्यासाठी तसेच मालमत्ता खरेदी करताना हारून आलम युसूफ आणि रणजितसिंग बिंद्रा यांची महत्त्वाची भूमिका होती. २०० कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान ईडीच्या तपासात ही मालमत्ता गैरमार्गाने मिळवली असल्याचे उघडकीस येताच ईडीने मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल करून शुक्रवारी या दोघांना अटक केली. २०१३ मध्ये दाऊदचा सहकारी इक्बाल मिर्ची याचा लंडनमध्ये मृत्यू झाला.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा