मुंबईत अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याचसोबत महिलांच्या सुरक्षेचा मुद्दाही गंभीर बनला आहे. नुकत्याच दोन महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांमुळे मुंबई हादरली. एकीकडे विकृतापासून आपला बचाव करण्यासाठी एका तरुणीने चालत्या ट्रेनमधून उडी घेतली. दुसरीकडे काही नराधमांनी एका तरुणीशी अत्यंत अश्लील चाळे करत तीला मारहाणही केली. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार मागच्या 2 वर्षात 816 अल्पवयीन मुली बलात्काराला बळी पडल्या.
14 वर्षांपूर्वी म्हणजेच 2002 मध्ये अत्याचाराची आकडेवारी 391 इतकी होती. पण 2016 मध्ये याच आकडेवारीत प्रचंड वाढ झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 2016 मध्ये अत्याचाराच्या घटनेत वाढ होऊन ती 2 हजार 393 एवढी झाली. यामध्ये 409 अल्पवयीन आणि 228 तरुणी अत्याचाराला बळी पडल्या. तर 2015 मध्ये बलात्काराचे 655 प्रकरण उघडकीस आले. यामध्ये 407 अल्पवयीन आणि 248 तरुणींसह महिला अत्याचाराला बळी पडल्या.
सरकारनेही महिलांच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त केला. पण ते सर्व निष्फळ ठरले. रेल्वेने महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महिलांच्या डब्यात पॅनिक बटन बसवण्याचा निर्णय घेतला. पण त्याची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही.