कोणताही सण आला की ते सण खऱ्या आयुष्याबरोबरच मालिकांमध्येही आपल्याला पाहायला मिळतात. मग दसरा असो की दिवाळी, गणपती असो की गुढीपाडवा, सर्वच सणांचं सेलिब्रेशन इथे आनंदात होताना बघायला मिळतं.
सध्या सर्वत्र रमजानचा माहौल आहे. मुस्लिम बांधवांसाठी रमजानचा सण सर्वात पवित्र असा सण असतो. रोजाच्या माध्यमातून करण्यात येणारी खुदाची इबादत आणि रमजानचा चाँद बघण्याची उत्सुकता या काळात बघायला मिळते. असंच काहीसं वातावरण आता झी मराठीच्या 'लागिरं झालं जी' ह्या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
सातारा जिल्हा आणि भारतीय सैन्याचं असलेलं नातं, तेथील तरुणांची स्वप्न आणि ती पूर्ण करण्यासाठीची त्यांची धडपड याची गोष्ट सांगणारी ‘लागिरं झालं जी’ ही मालिका झी मराठीवर नुकतीच सुरू झाली आहे. कमी वेळातच या मालिकेला प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळाली आहे. विशेषतः मुख्य भूमिकेत असलेले अजिंक्य आणि शीतल हे कमालीचे लोकप्रिय झाले आहेत. तसेच, राहुल, विकी, यास्मिन, हर्षवर्धन हे सहकलाकारही तेवढीच लोकप्रियता मिळवत आहेत. ग्रामीण पार्श्वभूमी, तिकडे घडणा-या गमती जमती, अज्या- शीतलीने खोड्या काढत एकमेकांवर कुरघोडी करणे, या गोष्टी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. याच मालिकेत आता प्रेक्षकांना ईद साजरी होताना बघायला मिळणार आहे. शीतलची मैत्रीण असलेली यास्मिनच्या घरी सर्व जण रमजान ईदनिमित्ताने एकत्र येणार असून ईद मुबारक म्हणत शिरकुर्माचा आस्वादही घेणार आहेत. येत्या 26 जूनला रमजान ईदच्या दिवशी ‘लागीरं झालं जी’ चा हा विशेष भाग सायंकाळी ७ वा. प्रेक्षकांना झी मराठीवर बघायला मिळणार आहे.