26 जुलै १९९९ हा दिवस सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस. याच दिवशी भारतीय सैन्यानं कारगिलमध्ये विजय मिळवला होता. भारतात घुसखोरी केलेल्या पाकिस्तानी सैन्याचा खात्मा करत भारतीय सैन्यानं कारगिल युद्ध जिंकलं होतं. जवळपास अडीच महिने चाललेल्या या युद्धाला 'ऑपरेशन विजय' हे नाव देण्यात आलं. या ऑपरेशन विजयमध्ये देशानं ५०० पेक्षा अधिक वीर योद्धे गमावले, तर १४०० पेक्षा जास्त जवान जखमी झाले. आज 26 जुलै 'कारगील विजय दिन'! या निमित्ताने या विजयाची गाथा.
१) १९९९ च्या मे महिन्यात कारगिल सिमेजवळ घुसखोरी झाल्याची माहिती भारताला मिळाली. सुरुवातीला हे फुटीरतावाद्यांचे कृत्य असल्याचं वाटलं. मात्र भारतीय सैन्यांना खूप उशिरा कळालं की, पाकिस्तानी सैन्यानं भारताच्या काही ठाण्यांवर कब्जा केलाय. त्यानंतर ऑपरेशन विजय या कारवाईला सुरुवात झाली.
२) जम्मू काश्मीरच्या द्रास-कारगिल सेक्टरमध्ये टायगर हिल आहे. टायगर हिल हे त्या भागातील सर्वोच्च शिखर आहे. घुसखोरांनी याच हिलवर ताबा मिळवला होता. त्यामुळे भारताचा महत्त्वाचा भूप्रदेश थेट शत्रूच्या टप्प्यात येत होता. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत टायगर हिलवर भारतीय झेंडा फडकवणं आवश्यक होतं.
३) टायगर हिलवरून राष्ट्रीय महामार्ग, श्रीनगर-लेह मार्ग तसंच ५६ ब्रिगेडचे लष्करी मुख्यालय टप्प्यात येत होते. याच मार्गावरून कारगिल सेक्टरला जीवनावश्यक वस्तू आणि इतर साहित्यांचा पुरवठा व्हायचा. पाकिस्तानी सैन्य याच महत्त्वाच्या वस्तूंना टार्गेट करत होतं.
४) टायगर हिलच्या लढाईत १८ ग्रेनेडियन्स,२ नागा आणि ८ शिख रेजिमेंट सहभागी होत्या. १८ ग्रेनेडियन्सनं अल्फा, चार्ली आणि घातक अशा तीन तुकड्या तयार केल्या होत्या.
५) या मिशनला ३ जुलैला सुरुवात झाली. शत्रूला गोंधळात टाकण्याची रणनिती भारतीय सैन्यांनी आखली होती. या रणनितीनुसार ८ शिख रेजिमेंटनं शत्रूच्या पुढच्या बाजूनं चाल केली. शत्रूनं गृहित धरलेल्या मार्गावरून चाल करून त्यांना चकवा देण्याचा भारतीय सैन्याचा हा कट होता.
६) दुसऱ्या घातक तुकडिनं अत्यंत धोकादायक मार्गावरून म्हणजेच मागच्या बाजूनं शिखर चढून जाण्याचा प्लॅन केला. यासाठीच ८ शिख रेजिमेंटनं पुढच्या बाजूनं चाल केली. जेणेकरून सैन्य शिखर चढून मागच्या बाजूनं शत्रूवर हल्ला करेल. या शिखराची उंची अधिक होती. पण भारतीय सैन्यांना काही करून टायगर हिलवर ताबा मिळवायचा होता.
७) योगेंद्र सिंह यादव या मोहिमेचे नेतृत्व करत होते. त्यांच्याकडे शिखरावर पोहोचून दोरी बांधण्याची जबाबदारी होती. पण योगेंद्र शिखराजवळ असताना शत्रूचे त्याच्याकडे लक्ष गेलं आणि शत्रूनं त्यांच्यावर गोळीबार केला. यात योगेंद्र यांना गोळी लागली. यामध्ये कंपनी कमांडरसह तीन जवान शहीद झाले. पण जखमी अवस्थेत योगेंद्र यांनी चढाई करत शिखर गाठले. त्यानंतर इतर सहकाऱ्यांची दोरखंडाच्या सहाय्यानं कड्यावर पोहोचण्याची व्यवस्था केली.
८) शिखरावर पोहोचताच सैनिकांनी पाकिस्तानी पोस्टवर हल्ला केला. यामध्ये चार पाकिस्तानी सैनिक ठार झाले. ४ जुलैला सकाळी भारताचा तिरंगा हिलवर डौलानं फडकला. या रणसंग्रामात भारताचे ५ जवान शहीद झाले. तर पाकिस्तानचे १० सैनिक ठार झाले.
९) ऑपरेशन विजय यशस्वी झाल्याचं तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी १४ जुलैला जाहीर केलं. २६ जुलैला ऑपरेशन विजय अधिकृतरित्या संपल्याचं जाहीर करण्यात आलं.