दररोज वाढणाऱ्या इंधनाच्या दरांमुळे सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर तर शंभरीपार गेले आहेत. सातत्याने होणाऱ्या या इंधनवाढीच्या विरोधात सोमवारी काँग्रेसने (congress) राज्यभरात आंदोलन केलं. यावेळी केंद्राने एक्साईजमध्ये वाढ करून जनतेला लुटल्याची टीका सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केली.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या असतानाही केंद्र सरकारने त्याचा पुरेसा लाभ देशातील ग्राहकांना मिळू दिला नाही. उलटपक्षी एक्साईजमध्ये वाढ करून लूट केली. त्यामुळेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत पेट्रोल शंभरीपार तर डिझेल नव्वदीत पोहोचलं आहे, असं मत अशोक चव्हाण (ashok chavan) यांनी व्यक्त केलं. सोबतच राज्यातील विविध शहरातील इंधनाच्या किंमतीचे दरपत्रकही दिले.
हेही वाचा- मोदी सरकारने ‘ब्ल्यू टिक’पेक्षा कोरोनाकडे जास्त लक्ष द्यावं- नवाब मलिक
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या असतानाही केंद्र सरकारने त्याचा पुरेसा लाभ देशातील ग्राहकांना मिळू दिला नाही. उलटपक्षी एक्साईजमध्ये वाढ करून लूट केली. त्यामुळेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत पेट्रोल शंभरीपार तर डिझेल नव्वदीत पोहोचले आहे. pic.twitter.com/WHuVxczjZq
— Ashok Chavan (@AshokChavanINC) June 7, 2021
याआधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील केंद्रावर टीका केली. सध्या पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर १८ रु. सेंट्रल रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर फंडासाठी घेतले जातात. तसंच पेट्रोलवर प्रति लिटर २.५० तर डिझेलवर प्रति लिटर ४ रुपये कृषी सेस घेतला जातो. या दरोडेखोरी विरोधात सोमवारी सकाळी ११ वाजता राज्यभर एकाचवेळी १ हजार ठिकाणी, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान ३ पेट्रोल पंपांवर आंदोलन करून काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारचा तीव्र निषेध करण्यात आल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली.
केंद्रात डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रणित यूपीएचं सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती १०० डॉलरपेक्षा जास्त प्रती बॅरल असतानाही देशांतर्गत किमतीवर त्याचा परिमाण होऊ दिला नाही. सामान्य लोकांना दिलासा देण्याची भूमिका त्यांनी घेतली होती.
परंतु आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती जवळपास ६४ डॉलर प्रति बॅरल एवढ्या कमी असतानाही पेट्रोल-डिझेलचे दर भरमसाठ वाढवलेले आहेत. मोदी सरकार हे सामान्य जनतेचे सरकार नसून ते फक्त मुठभर धनदांडग्या उद्योगपतींसाठी काम करणारे सरकार आहे, अशी टीकाही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.