लोकसभा-विधानसभा निडवणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे सर्वच पक्षांकडून निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनं जोरबैठका काढण्यास सुरूवात झाली आहे. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली, त्यापाठोपाठ शिवसेनेनं मंगळवारी निवडणुकीच्या तयारीसाठी बैठक घेतली. या बैठकीत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा देत कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. भाजपाबरोबर युती होईल की नाही याचा विचार न करता निवडणुकीच्या तयारीला लागा असंही, यावेळी ते म्हणाले.
शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या दृष्टीनं पुढची रणनिती ठरवण्यासाठी तसंच पक्षबांधणीच्यादृष्टीनं तयारी करण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीला दक्षिण मुंबई आणि मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील सर्व पदाधिकारी, खासदार, आमदार आणि नगरसेवकांनी हजेरी लावली होती.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी-कार्यकर्ते, खासदार-आमदार आणि नगरसेवकांना स्वबळावर निवडणुका लढण्याच्या आणि जिंकण्याच्यादृष्टीनं तयारीला लागण्याचे आदेश दिले. तर लोकसभेच्या ४८ जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचीही जोदरार चर्चा या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राजकीय वर्तुळात रंगलेल्या चर्चेनुसार शिवसेनेकडून भाजपाच्या लोकसभा उमेदवाराच्या विरोधात दिग्गजांना उतरवण्यात येणार असून यावरही यावेळी चर्चा झाली. तर विद्यमान १८ खासदारांना संधी देण्याबरोबरच काही नावावरही चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार निलम गोऱ्हे, शुभा राऊळ, विश्वनाथ महाडेश्वर अशी ही नाव असल्याचं समजत आहे. पण याला अद्याप कुणीही अधिकृत पुष्टी दिलेली नाही.
गणेशोत्सवाच्या आधी शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्यात येणार असल्याची माहितीही समोर येत आहे.
हेही वाचा-
इंटरनेट फुकट देता, मग रेशनही द्या - उद्धव ठाकरे
पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना प्रचारात उतरवणं बंद करा! उद्धव ठाकरे यांनी भाजपाला ठणकावलं