मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने मंगळवारी अनेक नेत्यांनी कोरेगाव-भीमा प्रकरणावर आपली निवेदने मुख्यमंत्र्यांना सादर केल्याने मंत्रीमंडळ बैठकीवर भीमा कोरेगावचे पडसाद उमटले.
भीमा कोरेगावचा हिंसाचार होऊन दुसरा आठवडा सुरू झाला तरी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना अजून अटक झालेली नाही. तर दुसरीकडे महाराष्ट्र बंद करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना अटक करण्याचं सत्र सुरू आहे. हा प्रकार म्हणजे दलितांना घाबरवण्याचा प्रयत्न असल्याचं आरपीआयचे जोगेंद्र कवाडे यांनी सांगितलं. पोलिसांनी हे अटकसत्र न थांबवल्यास पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकार या घटनेवर अतिशय गंभीर असल्याचं सांगितलं.
दरम्यान, कोरेगाव-भीमा प्रकरणात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना अद्याप अटक न झाल्याने आरपीआय कार्यकर्ते सचिन खरात यांनी गळ्यात मडकं व पाठीवर झाडू बांधून मंत्रालयासमोर सरकारचा निषेध नोंदवला.
पेशवाईमध्ये दलितांना थुंकण्यासाठी गळ्यात मडकं आणि पाठीवर झाडू बांधण्याची सक्ती होती. सध्या राज्यात नव पेशवाई आली असून, शांततेच्या दिशेने जाणाऱ्या दलितांवर भीमा कोरेगावमध्ये हल्ला झाला. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल होऊनही त्यांच्यावर कारवाई होत नाही. ही एक प्रकारे नव पेशवाई असल्याने या नव पेशवाईचा विरोध करत असल्याचं खरात यांनी सांगितलं.
हेही वाचा-
महाराष्ट्र बंद: सोशल मीडियावर अाक्षेपार्ह पोस्ट टाकली? होणार कायदेशीर कारवाई