राज्यातील ३५ अधिकृत हॉटेल थांब्यावर एसटी प्रवाशांसाठी एसटी प्रशासनाने अल्पोपहार सेवा सुरु केली आहे. या सेवेत प्रवाशांना चहा-नाश्ता अवघ्या ३० रुपयांत उपलब्ध करून देण्यात येत आहे. पण काही हॉटेलचालक प्रवाशांकडून जास्त दर घेत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर एसटी प्रशासनाने या हॉटेलचालकांना तंबी दिली आहे. त्यानुसार, बसचे तिकीट दाखवून प्रवाशांना ३० रुपयांत नाश्ता करता येईल.
लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढत चालली आहे. तशातच एसटी प्रशासन तोट्यातून बाहेर येण्यासाठी वेगवेगळ्या उपायोजना राबवत आहे. एसटी बसने प्रवास करताना प्रवाशांच्या अल्पोपहारासाठी बस मोजक्या हॉटेल, रेस्टॉरंटवर थांबवण्यात येते. तेथील हॉटेलमालकांनी प्रवाशांकडून जास्त पैसे आकारु नये, म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे.
मुंबईतील ४, ठाण्यातील ३ ठिकाणच्या अधिकृत थांब्यावर ही योजना सुरू आहे. त्याचबरोबर बुलढाणा, औरंगाबाद, जालना, बीड या मार्गावरील प्रत्येकी एका थांब्यावर ही योजना सुरू करण्यात आली आहे. जी बस थांब्यावर उभी आहे केवळ त्याच बसमधील प्रवाशांना तिकीट दाखवून या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
या योजनेंतर्गत शिरा, पोहे, उपमा, वडा-पाव, इडली, मेदूवडा अशा पदार्थांपैकी कोणताही एक पदार्थ आणि चहा प्रवाशांना मिळेल. या पदार्थांची एकूण किंमत ३० रुपये निश्चित करण्यात आली आहे.
या योजनेसाठी एसटी प्रशासनाने संबंधित हॉटेल चालकाशी एक वर्षांचा करार केला असून एसटी थांब्यासाठी सदर हॉटेल मालकाने चहा आणि नाश्ता ३० रुपयांत देणे बंधनकारक असल्याचा दावा एसटी प्रशासनाकडून करण्यात आला आहे. हॉटेल चालकांनी प्रवाशांकडून जादा दर आकारल्यास एसटी त्याची तक्रार ०२२-२३०७५५३९ या क्रमांकावर करा, असे आवाहन एसटी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
हे देखील वाचा -
गणेशोत्सवासाठी 'परे' च्या विशेष गाड्या
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)