आर्थिक वर्ष २०२१-२१ साठी ३१ मार्चपर्यंत प्राप्तिकर (इन्कम टॅक्स) रिटर्न (आयटीआर) भरण्याची अखेरची तारीख आहे. जर तुमचे उत्पन्न कर सूट मर्यादेत येत असेल तर तुम्हाला आयटीआर दाखल करणं आवश्यक नाही. मात्र, आयटीआर दाखल केल्यास आपल्याला बरेच फायदे मिळतात. तुम्हाला कर भरावा लागत नसेल तरी तुम्ही आयटीआर दाखल करणं फायदेशीर असेल. आयटीआर दाखल केल्याने कोणते फायदे मिळतात ते जाणून घेऊया.
कर्ज सहज मिळते
आयटीआर हा तुमच्या उत्पन्नाचा पुरावा आहे. सर्व सरकारी आणि खासगी बँका आयटीआर उत्पन्नाचा पुरावा म्हणून स्वीकारतात. जर तुम्ही बँकेकडे कर्जासाठी अर्ज केला तर बर्याच बँका आणि एनबीएफसी तुम्हाला मागील ३ वर्षांचे आयटीआर विचारतात. आपण नियमितपणे आयटीआर दाखल केल्यास आपल्यास सहजपणे बँकेकडून कर्ज मिळेल.
व्हिसासाठी आवश्यक
जर आपण दुसर्या देशात जात असाल आणि व्हिसासाठी अर्ज केल्यास तुम्हाला आयटीआर मागितले जाईल. अनेक देशांमधील व्हिसा अधिकारी व्हिसासाठी ३ ते ५ वर्षांच्या आयटीआरची मागणी करतात. आयटीआरच्या माध्यमातून ते तपासतात की जी व्यक्ती त्यांच्या देशात येणार आहे त्याची आर्थिक स्थिती कशी आहे.
पत्त्याचा पुरावा
आयटीआरची पावती आपल्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठविली जाते. ही पावती पत्त्याचा पुरावा (अॅड्रेस प्रूफ) म्हणून चालू शकते. याशिवाय आयटीआर आपल्यासाठी उत्पन्नाचा पुरावा म्हणूनही चालते.
व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक
आपल्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आयटीआर भरणे फार महत्वाचे आहे. याशिवाय एखादे कंत्राट घ्यायचं असेल तर तुम्हाला आयटीआर दाखवावे लागेल. कोणत्या सरकारी विभागातील कंत्राट घ्यायचं असेल तर मागील पाच वर्षातील आयटीआर द्यावे लागते.
अधिक विमा संरक्षणासाठी
तुम्हाला जर एक कोटी रुपयांचा विमा संरक्षण (टर्म प्लॅन) घ्यायचा असेल तर विमा कंपन्या तुमच्याकडून आयटीआर मागू शकतात. खरं तर, ते फक्त आपल्या उत्पन्नाचा स्रोत जाणून घेण्यासाठी आणि नियमितपणा तपासण्यासाठी आयटीआरवर अवलंबून असतात.